येळ्ळुरात घडलेल्या घटनेने भीतीचे वातावरण, प्रतीक्षा निदानाची
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूरमध्ये डेंग्यूसदृश आजाराने एका सात वषीय बालिकेसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पाटील गल्ली येथे घडली. या घटनेमुळे येळ्ळूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजाराम निंगोजी पाटील (वय 68) आणि प्रांजल रजनीकांत पाटील (वय 7, दोघेही रा. पाटील गल्ली-येळळूर) अशी त्यांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून येळ्ळूर परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या कोरोनामुळे ताप आला तरी बरेच जण घाबरून सांगण्यास तयार नाहीत. मात्र, अधिक वेळ उपचार करण्यासाठी लावल्यामुळे या घटना घडत आहेत. पाटील गल्ली परिसरात यापूर्वीही तीन-चार जणांना डेंग्यूची लागण झाली होती. त्यामधून सुदैवानेच हे सारे जण बरे झाले आहेत.
मयत झालेल्या प्रांजल हिचा भाऊही डेंग्यूसदृश आजाराने त्रस्त झाला आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती बरी आहे. मात्र प्रांजल हिचा खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. डेंग्यूबाबत गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. आशा कार्यकर्त्या तसेच वैद्यकीय कर्मचारी घरोघरी जाऊन चौकशी करत आहेत. मात्र, याबाबत अजूनही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
पाटील गल्ली येथे रुग्ण आढळल्यानंतर तातडीने बैठक घेण्यात आली. परिसर स्वच्छ करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. डेंग्यूसारख्या भयानक आजाराबाबत प्रत्येकानेच दक्षता घेणे गरजेचे आहे. शोकाकुल वातावरणात त्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत राजाराम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली असा परिवार आहे. प्रांजल हिच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी, काका, काकू असा परिवार आहे.
अजून अहवाल आला नाही-डॉ. रमेश दंडगी
या दोघांचा मृत्यू डेंग्यूनेच झाला आहे का? याबाबत येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंदाचे वैद्यकीय अधिकारी रमेश दंडगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून तरी तसा अहवाल आला नाही. अहवाल आल्यानंतरच आम्ही ते सांगू शकतो. मात्र, डेंग्यूबाबत प्रत्येकानेच काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
ग्राम पंचायतमध्ये तातडीने बैठक
डेंग्यूसदृश आजाराने दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ग्राम पंचायतमध्ये तातडीने बैठक घेण्यात आली. यामध्ये यावर चर्चा झाली. मात्र, त्यासंदर्भात वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे पीडीओ अरुण नायक यांनी सांगितले.
परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा साठा अधिक करू नये. स्वच्छ पाण्यातूनच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. तेव्हा प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधक औषधेही वापरावीत, घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.