कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची घोषणा
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय ‘प्राचार्य आर. के. कणबरकर पुरस्कार’ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना जाहिर करण्यात आला आहे. हा पुरस्कार विद्यापीठात 13 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता प्रदान करण्यात येणार असून, 1 लाख 51 हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1935 मध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील अंबपमध्ये झाला. त्यांनी एम. ए., एल. एल. बी., पीएच. डी., पदवी प्रथम श्रीणीत उत्तीर्ण केली आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना 2015 मध्ये डी. लिट. पदवी देवून सन्मानित केले आहे. तसेच डॉ. पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील कार्यातून शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. वाय. पाटील यांनी के. जी. टू पी. जी. पर्यंत शिक्षण सर्वसामान्यांना मिळावे म्हणून 172 पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांची स्थापना केली आहे. पुणे, मुंबई आणि कोल्हापुरातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी शिक्षण संस्थांमधून अनेक सर्वसामान्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळाले. त्याचबरोबर श्रीराम सहकारी संस्था, महापालिका, जिल्हा मार्केट, राज्य विद्युत मंडळ, देवस्थान समिती, नाटय़ परिषद आदी राजकीय, सहकार क्षेत्रातील संस्थांचे नेतृत्व केले आहे. 27 नोव्हेंबर 2009 ते 2013 त्रिपुराचे राज्यपाल, 22 मार्च 2013 ते 26 नोव्हेंबर 2015 बिहारचे राज्यपाल, 3 जुलै ते 2014 ते 17 जुलै 2014 पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. सर्वच क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱया व्यक्तीला प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराने शिवाजी विद्यापीठ सन्मानित करीत आहे, हा विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे, असेही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजीविद्यापीठास 25 लाख रूपयांच्या ठेवीसाठी धनादेश प्रदान केला. हा पुरस्कार देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा तसेच अन्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱया व्यक्तीला किंवा संस्थेला देण्याचे ठरले आहे. 1980 ते 83 या कालावधीत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कणबरकर कार्यरत होते. त्यांच्या कालावधीत अनेक विभागांची नव्याने निर्मिर्ती झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शाहू पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रा. रा. कृ. कणबरकर पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्राचार्य बी. ए. खोत, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. भालबा विभूते, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर आदी उपस्थित होते.