ऑनलाइन टीम / पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी)च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘डॉ.पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धा -२०२०’ चे दिनांक ९ जानेवारी २०२० रोजी आयएमईडी, एरंडवणे, पौड रोड, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.
या स्पर्धेचे ७ वें वर्ष आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रथम क्रमांकास रुपये दहा हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रुपये सात हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकास पाच हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.
‘डॉ. पतंगराव कदम- एक द्रष्टा नेता’, ‘शेतकरी आत्महत्या- कारणे व उपाय’, ‘पालकांचे अवास्तव मोबाईल प्रेम आणि पाल्यांच्या वर्तणूक समस्या, ‘बुलेट ट्रेन- स्वप्न अथवा वास्तव’, ‘युवकांचे भारतीय अर्थ व्यवस्थेतील योगदान’, हे स्पर्धेचे विषय आहेत.