हिंदू संघटनांचे तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
संविधान शिल्पी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करणारे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी व त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करणारे निवेदन पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली हिंदू संघटनांच्यावतीने खानापूर तहसीलदारांना देण्यात आले. उपतहसीलदार कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, गृहमंत्री अरगेंद्र ज्ञानेंद्र तसेच कायदामंत्री मधू स्वामी यांना पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून भारताची घटना लिहिली आहे. त्यांनी लिहिलेल्या घटनेनुसारच आज देशाचा कारभार चालतो. देशाचे कायदा मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम सेवा केली. एवढेच काय त्यांनी 370 कलम रद्द करण्याचीही मागणी केली होती. अशा या महान पुरुषाचा अवमान न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमात केला आहे. जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा काढणार नाही तोपर्यंत झेंडावंदन करणार नाही, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे राज्य घटनेचाच अवमान केल्याने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना ंपडित ओगले यांनी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान कदापीही सहन करणार नाही. अवमान करण्यास कारणीभूत असलेल्या न्यायाधीशांवर कुठल्याही परिस्थितीत कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
याप्रसंगी अनंत सावंत, ऍड. आकाश अथणीकर, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, धनश्री सरदेसाई, राजू रायका यांची भाषणे झाली.
यावेळी नगरसेवक विनायक कलाल, प्रकाश निलजकर, अशोक नेसरीकर, महेश गुरव, संजय गुरव, सागर अष्टेकर, किरण तुडयेकर, सुनिल मासेकर, जोतिबा देवलत्तकर, मोहन नंदगडकर, मंगल गोसावी, मोहन शिंगाडे, पंकज कुट्रे, रोशन सुतार, अमोल सुतार, संभाजी पाटील, किरण अष्टेकर, गुंडू तोपिनकट्टी, गोपाळ भेकणे, बन्सी कुंभार, आकाश पाटील यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.