भवानीनगर येथील घटनेने खळबळ : मयत हलगा-बस्तवाडचा
प्रतिनिधी /बेळगाव
भवानीनगर येथे पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या रिअल इस्टेटधारकाचा अज्ञातांनी डोळय़ात मिरचीपूड टाकून भीषण खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून खून कोणी व कशासाठी केला? याबाबत आता पोलिसांनी तपासाची चपे फिरविली आहेत.
राजू मल्लाप्पा दोड्डभोमण्णावर (वय 41, मूळचा रा. हलगा-बस्तवाड, सध्या रा. संस्कृती पाम्स, टिळकवाडी) असे त्या खून झालेल्या रिअल इस्टेटधारकाचे नाव आहे. राजू हा रिअल इस्टेटबरोबरच बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत होता. जमिनीचे व्यवहार मोठय़ा प्रमाणात करायचा. मंगळवारी सकाळी तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. त्याला कोणी तरी फोनदेखील केला होता. त्यामुळे तो तेथे गेला असता ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.
मंडोळी-भवानीनगर रोडवर आपल्या घरापासून काही अंतरावरच त्याचा धारदार शस्त्रांनी भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केले आहे. या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. राजू याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, चार मुले असा परिवार आहे.
राजू हा सकाळी 5.15 वाजता घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याला कोणी तरी फोन केला आहे. त्यामुळे तो त्या ठिकाणी गेला. पहाटेच्यावेळी वर्दळ नसल्यामुळे अज्ञात हल्लेखोरांनी अचानकपणे त्याच्या डोळय़ात मिरचीपूड टाकली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले आहेत. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
फोन कोणी केला?
राजू हा जमिनीचे व्यवहार करत होता. बांधकाम क्षेत्रामध्येही काम करत होता. जमीन व पैशांच्या व्यवहारातूनच त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याला फोन कोणी केला? याबद्दल पोलीस तपास करत आहेत.