सातारा : अतिवृष्टीमध्ये कोयना विभागातील ढोकावळे या निसर्गाचा प्रकोप झालेल्या भूस्खलन ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जवळपास पाच किलोमीटर पायपीट करून भेट दिली. परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन प्रशासनातर्फे सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
पाटण तालुक्यातल्या मोरणा खोऱ्यातील खालचे आंबेघर येथे भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली दडपलेल्या घरांना त्यांनी भेट दिली. पाच किलोमीटर पायपीट करून रिसवड येथून ढोकावळे येथे जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. जास्तीत जास्त मदत देण्याची त्यांनी ग्वाही दिली. तसेच शासनाकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात येत आहे.
पूरग्रस्तांची तात्पुरती सोय मनेरी चाफेर या ठिकाणी माध्यमिक शाळेत करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन वृद्ध तसेच लहान मुले आणि जखमी नागरिक यांची भेट घेऊन गौडा यांनी आस्थेने विचारपूस केली. रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन जखमी नागरिकांना लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याची तातडीने सोय करण्यात आली. 150 दुर्घटनाग्रस्त नागरिकांना भोजनाचे साहित्य पुरविण्याची त्यांनी तातडीने सोय केली. यावेळी चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. आरोग्य पथकाने जागेवरच पोस्टमार्टम केले. मिरगाव चाफेर येथील माध्यमिक शाळेमध्ये उर्वरित नागरिकांना तातडीने हलवण्यात आले. अन्न ,ब्लॅंकेट आणि बेड शीट पुरविण्यात आले.