प्रतिनिधी/ चिपळूण
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सरकारविरोधात मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राज्यभर आंदोलन हाती घेण्यात आले आहे. हे आंदोलन उग्ररूप धारण करण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीचे निर्णय घेऊन उपाययोजना कराव्यात, असा इशारा बुधवारी मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला दिला आहे.
चिपळूण मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यामध्ये नमूद केले आहे की, आरक्षण स्थगितीमुळे मराठा समाजात राज्य सरकार विरोधात नकारात्मक भावना असून या संताप, उद्रेकाची परिणती मोर्चासारख्या आंदोलनात होऊ नये म्हणून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. स्थगितीचा परिणाम शैक्षणिक प्रवेशांवर झाला असून मराठा तरूणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 12 टक्के जागा वाढवून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत. तसेच अकरावी, बारावी व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश स्थगिती आदेशापूर्वीच झाल्याने रद्द करणे अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे ते प्रवेश संरक्षित करण्यासाठी योग्य ते आदेश प्राप्त करणे गरजेचे आहे.
राज्य शासनाने स्थगिती आदेशापुर्वी भरती जाहिराती देऊन काही नोकऱयांसाठी लेखी परीक्षाही घेतल्या आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे मुलाखती प्रलंबित आहेत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून देऊन मराठा तरूणांना न्याय देण्याच्यादृष्टीने तत्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज करून तातडीने पाच सदस्यीय घटनापीठ गठीत करण्याची विनंती करून स्थगिती आदेश उठवण्यासाठी अर्ज करावा. संसदेचे अधिवेशन सुरू असून त्यामध्ये राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करून राज्यघटनेच्या परिशिष्ठ 9मध्ये समावेश करून कलम 31 क नुसार या कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, अजित साळवी, सतीश कदम, सुधीर भोसले, सत्यवान मोरे, प्रदीप साळुंखे, राजेश कदम, पूर्वा साळवी, मिनाली शिंदे, समृद्धी साळवी, अक्षता शिंदे, शिवाजी साळवी, संतोष सावंतदेसाई, सतीश मोरे, रामदास राणे, रणजीत डांगे, राजेंद्र खेतले, राजेंद्र राजेशिर्के, शैलेश शिंदे, सुरज कदम, सुनील कदम, सुबोध सावंतदेसाई, मकरंद जाधव आदी उपस्थित होते.