सातारा / प्रतिनिधी :
कोरोना बाधित रूग्णांची संख्या घटत असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन पुर्णपणे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षानंतर पहिल्यांदाच सर्व दुकाने रात्री 10 वा. पर्यंत खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे ऐरवी सायंकाळी 4 नंतर बंद असलेली बाजारपेठ पुन्हा नव्याने रात्री 10 पर्यंत भरलेली दिसत आहे. पण रात्रीच्या सुमारास खरेदीकरीता ग्राहकच फिरकत नसल्याने व्यावसायिकांना ग्राहकांची वाट पहावी लागत आहे.
अद्याप ही सकाळच्या सुमारासच बाजारपेठेत गर्दी होत आहे. दुपारनंतर काही रस्ते तर नागरिकांविना ओस पडलेले दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन अद्याप ही कायम आहे की काय असे वाटत आहे. काही व्यापाऱ्यांनी तर रात्री 8 नंतर आपली दुकाने देखील बंद केली होती. मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. करोनाचा कहर ओसरत चालल्यावर बाजारपेठा ठराविक वेळेत सुरू करण्यात आल्या होत्या. व्यापाऱ्यांकडून व्यवसाय खुला करण्यासाठीच्या वेळेत वाढ करून मागण्यात येत होती. त्यानुसार आता रात्री 10 वा. पर्यंत दुकाने खुली करण्याची परवाणगी दिली आहे. पण ग्राहकांविना व्यापारीवर्ग पुन्हा हैराण झाला आहे.