आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रतिपादन : इदलहोंड येथे कबड्डी स्पर्धा उत्साहात, डिसेंबरमध्ये पुन्हा कबड्डी स्पर्धा
प्रतिनिधी /खानापूर
अठरापगड जातींच्या सर्वांगीण उत्कर्षाचा विचार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य सर्वधर्म समभावाचे प्रतीक होते. शिवरायांनी कोणत्याही जाती- धर्माचा द्वेष शिकवला नाही. परस्त्राला मातेसमान वागविताना परधर्मियांना बंधूंची वागणूक दिली. हा इतिहास नजरेआड करून चालणार नाही. त्यामुळे नव्या दमाच्या तरुणांनी शिवरायांचा हा आदर्श समोर ठेवून वाटचाल केल्यास समाजात शांती आणि सलोखा नांदण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
इदलहोंड (ता. खानापूर) येथील सरकार ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार दिगंबर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजप युवा नेते पंडित ओगले, जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, गोविंद जाधव, शंकर पाटील आदी उपस्थित होते.
आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, जगाला प्रेरणा देणारे कार्य केलेल्या जाणत्या राजाला कोणत्याही एका जाती-धर्मापुरते मर्यादित ठेवणे म्हणजे त्यांच्या हिमालयाएवढय़ा विशाल व्यक्तिमत्त्वाला संकुचित केल्यासारखे आहे. त्याकरिता महापुरुषांना जाती-पातीत विभागण्यापेक्षा त्यांचे विचार आणि आदर्श कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्यास खऱया अर्थाने समाजात शांती आणि समृद्धी नांदेल. छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात सर्व जाती-धर्मांना स्थान होते. किंबहुना समाजाच्या प्रत्येक घटकाचा त्यात महाराजांनी समावेश केला होता. शिवरायांच्या या सर्वसमावेशक हिंदुत्वाचे आम्ही पूजक आहोत, असे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले. डिसेंबरअखेरीस अंजलीताई फाऊंडेशनच्यावतीने खानापुरात भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
भाजप नेते विठ्ठल हलगेकर म्हणाले, कोरोनामुळे आलेला निरुत्साह आणि नकारात्मकता झटकण्यासाठी गावोगावी होत असलेल्या क्रीडास्पर्धा महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. खेळांना प्रोत्साहन देण्याची भूमिका सर्वांनी पक्षभेद विसरून पार पाडावी.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पंडित ओगले म्हणाले, धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी तरुणांनी सज्ज राहावे. व्यसनापासून दूर राहून क्रीडा प्रेम जोपासावे. तरुणांनी खेळाच्या माध्यमातून अंगी शिस्त, संयम आणि काटेकोरपणा बाळगण्याचा प्रयत्न करावा. देश व समाजकार्यासाठी आपले योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
माजी आमदार दिगंबर पाटील यांनी मराठी शाळा, भाषा व संस्कृती संवर्धनासाठी प्रत्येकाने सजगपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी आमदार अंजली निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कृष्णा कुंभार, मनोहर जाधव, गर्लगुंजी ग्रा.पं. सदस्य हणमंत मेलगे, प्रसाद पाटील, सरकार ग्रुपचे अध्यक्ष शंकर पाखरे आदी उपस्थित होते. इदलहोंड येथील या स्पर्धेत 26 नामवंत संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धा फ्लडलाईटमध्ये झाल्या. या स्पर्धेत गर्लगुंजी संघाने अंतिम सामन्यात तोराळी संघाचा पराभव करून स्पर्धा जिंकली. तोराळी संघ उपविजेता ठरला. कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती.