प्राणलिंग स्वामीजी यांचे प्रतिपादन, तरुण भारत निपाणी कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा
वार्ताहर/ निपाणी
तरुण भारतने परखडपणे बातम्या प्रसिद्ध करताना आजपर्यंत समाजातील प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमान निर्माण केला आहे. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट अशा बातम्या प्रसिद्ध करून पारदर्शी वृत्तलेखनाचा इतिहास रचला आहे. म्हणूनच आजही प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात तरुण भारत वाचल्याशिवाय होत नाही. असे हे वृत्तपत्र सामान्य माणसाचे प्रतिबिंब ठरले आहे, असे प्रतिपादन समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.
तरुण भारतच्या निपाणी कार्यालयाचा 27 वा वर्धापन दिन शनिवारी मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी तालुका परिसरातील मान्यवरांसह हजारो वाचकांनी तरुण भारत निपाणी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन स्नेहमेळाव्यात सहभागी होत शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी प्राणलिंग स्वामीजी बोलत होते. वर्धापन दिन सोहळय़ाची सुरुवात बाळकृष्ण वामन जोशी यांच्या पौरोहित्याखाली उपसंपादक भानुदास कोंडेकर व स्मिता कोंडेकर दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजेने झाली.
यानंतर तरुण भारतच्या ‘कोरोनानंतरचे जग’ या वर्धापन दिन विशेष पुरवणीचे प्रकाशन बसवज्योती फाऊंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री, व्यवस्थापक गिरीधर शंकर, जाहिरात प्रतिनिधी सोहन पाटील, आवृत्ती प्रमुख परशराम शिसोदे, सोशल मीडिया प्रमुख प्रसाद सू. प्रभू यांच्यासह मान्यवर, नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना बसवप्रसाद जोल्ले म्हणाले, तरुण भारत ही बेळगाव जिल्हय़ाची अस्मिता आहे. परखड वृत्त लेखणीतून वाचकांच्या मनात तरुण भारतने सन्मान निर्माण केला आहे. शाळकरी मुले, युवक यांच्यापासून वृद्ध अशा सर्वांच्या आवडी जोपासत वृत्त लेखनातून वाचनाची आवड निर्माण केली आहे, असे सांगितले.
माजी आमदार काका पाटील म्हणाले, तरुण भारतने मराठी माणसांमध्ये नेहमीच वाचनाची आवड निर्माण केली आहे. कर्नाटकासह महाराष्ट्रात आवृत्तींच्या माध्यमातून प्रसिद्ध होणारा तरुण भारत वाचकांच्या मनात घर करून आहे, म्हणूनच तरुण भारत आपलासा वाटतो.
युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, वाचन संस्कृती कमी होत आहे. ही समाजापुढे एक नवी चिंता आहे. वाचन संस्कृतीचे भविष्यात काय? अशा विदारक परिस्थितीत तरुण भारतने सर्व समावेशक वृत्त संकलन व प्रसिद्धीतून वाचन संस्कृती टिकविण्याचा वसा कायम ठेवला आहे. सीमाभागात मराठी माणसाला आपलंस करणारा तरुण भारत येत्या काळात यशस्वी भरारी घेवो, ही आपली सदिच्छा आहे, असे सांगितले.
यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, मल्लिकार्जुन जगजंपी, सभापती सद्दाम नगारजी, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, जि. पं. सदस्य राजेंद वड्डर, सिद्धू नराटे, ता. पं. सदस्य दत्तात्रय वडगावे, उद्योजक रोहन साळवे, राजेश कदम, ग्रा. पं. अध्यक्ष रोहन भिवसे, बबन हवालदार, राजश्री पोवार, ग्रा. पं. उपाध्यक्षा लक्ष्मी मगदूम, अशोककुमार असोदे यांच्यासह नगरसेवक, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, विविध ग्रा. पं. चे अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य, वाचक उपस्थित होते.