नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भारत व्हॅक्सिन कॅपिटल असूनही या देशातील लस पंतप्रधान मोदींनी निर्यात केली आणि इथल्या लोकांना लस मिळेणा अशी स्थिती झाली. आता पंतप्रधानांनी व्हॅक्सिन स्ट्रॅटेजी बनवून कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अन्यथा देशात तिसरी, चौथी नव्हे तर कोरोनाच्या अनेक लाटा येतील, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला. ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, देशात कोरोना लसी तयार होत असूनही या देशातील नागरिकांना लस मिळत नाही. या देशातील नागरिकांच्या लसी पंतप्रधानांनी व्हॅक्सिन डिप्लोमसीच्या नावाखाली इतर देशांना दिल्या. देशात आतापर्यंत केवळ तीन टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं असून 97 टक्के लोकांना लस मिळालेली नाही, याला पंतप्रधान जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. विरोधी पक्षांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या सूचना पंतप्रधानांनी स्वीकारल्या नाहीत. देशात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला पंतप्रधानच जबाबदार आहेत.
कोरोना हा सतत बदल होणारा विषाणू असल्याने याला जेवढा वेळ दिला जाईल तितकाच तो भयानक होईल. लवकरात लवकर सर्व लोकांचं लसीकरण करणे हाच त्यावर उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकांना लस जर लवकर उपलब्ध करुन दिली नाही तर कोरोना लसीच्या पकडीतून निसटून जाईल. आताचा लसीकरणाचा वेग असाच राहिला तर सर्वांचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी मे 2024 साल उजाडेल. तोपर्यंत कोरोनामध्ये बदल होईल आणि या लसीचा काहीच फायदा होणार नाही. मी याबद्दल फेब्रुवारीमध्येच सरकारला सतर्क केलं होतं पण सरकार आणि पंतप्रधानाना कोरोना समजलाच नाही, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.