बुडाविरोधात ता.पं.मध्ये पुन्हा ठराव, गावाला गावठाण वाढवण्याच्या मागणीवर जोर
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्यातील तब्बल 28 गावांमधील जमीन बुडा घेऊ पाहत आहे. यासाठी तालुका पंचायतच्या सर्व सदस्यांनी बुडाला नोटीस पाठवून याबाबत विचारले होते. मात्र याकडे कानाडोळा करण्यात आल्याने मंगळवारी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त करत बुडाचा निषेध व्यक्त केला आहे. याचबरोबर पुन्हा एकदा ठराव करून शेतकऱयांना देशोधडीला लावणारा विकास आम्हाला नको, अशी मागणी जोर केली. सुरुवातीलाच सुनील अष्टेकर यांनी हा विषय मांडत सर्व सदस्यांचे लक्ष वेधले. यानंतर सर्वांनीच या विषयाकडे गांभीर्याने घेऊन बुडाविरोधात तीव्र आवाज उठविण्यात आला.
मनमानी कारभार करत आणि कोणालाही विश्वासात न घेता बुडा जमिनी ताब्यात घेत आहे. त्यामुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. याचे सोयरसुतक बुडाला नाही. त्यामुळेच तालुका पंचायतमधून बुडाला नोटीस बजावण्यात आली होती. शहर व उपनगरांतील जमिनी बळकावल्यानंतर बुडाचा डोळा आता ग्रामीण भागातील तिबारपिकी जमिनीवर आहे. यापुढे तालुक्मयातील कोणत्याही गावातील जमिनी घ्यायच्या असतील तर तालुका पंचायत, ग्राम पंचायतमधील ना हरकतपत्र बंधनकारक असणे गरजेचे असल्याचा ठराव तालुका पंचायतीमध्ये करण्यात आला आहे. मात्र बुडाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. व पुन्हा एकदा ठराव करून बुडाला नोटीस पाठविण्याचे सांगण्यात आले.
ज्याप्रमाणे बुडा ग्रामीण भागावर डोळा ठेवून आहे. त्याचप्रमाणे यापुढे सरकारनेही ग्राम पंचायतींना गावठाण जमीन वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. याचबरोबर प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये गायरान जमीन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. अनेक सरकारी योजना राबवून शेतकऱयांवर काळ आणत सरकार मात्र विकास साधत आहे. अशा विकासाला विचारणार कोण? याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
संबंधित ग्राम पंचायत आणि तालुका पंचायतची परवानगी घेऊनच जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करावी. सध्या ज्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात नोटीस पाठवून जाब विचारावा, असा ठराव तालुका पंचायतच्या सर्वसाधारण बैठकीत दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आला होता. या ठरावानंतर आता पुन्हा ता.पं. सदस्य उदय सिद्दण्णावर, सुनील अष्टेकर, नारायण नलवडे, काशिनाथ धर्मोजी, लक्ष्मी मेत्री, नीना काकतकर, यल्लाप्पा कोलकार, महांतेश अलाबादी यांच्यासह सर्वांनी आक्रमक पवित्रा घेऊन पुन्हा एकदा बुडा विरोधात ठराव संमत केला आहे.
येळ्ळूर, कडोली, काकती, आंबेवाडी, गुंजेनहट्टी आदी ग्राम पंचायत हद्दीतील तसेच बेळगाव तालुक्मयातील 28 गावे बुडामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र या गावांचा समावेश बुडामध्ये झाला तर येथील शेतकरी उपाशी राहणार आहेत. त्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी बुडा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. जर शेतकऱयांच्या जमिनी जात असतील तर आपण कदापीही गप्प बसणार नाही, असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले..