सहकार वृद्धीतूनच खरा समाजवाद, ‘लोकमान्य मल्टिपर्पज’चे संस्थापक किरण ठाकूर यांचा विश्वास, सहकार महापरिषदेत मांडली ‘लोकमान्य’ची यशोगाथा
पुणे / प्रतिनिधी
सहकार वाढविण्यासाठी सहकारी संस्थांवरील निर्बंध हटविणे गरजेचे आहे. ते हटविल्यास सहकारी संस्था अन्य बँकापेक्षा आर्थिकदृष्टÎा अधिक मजबूत होतील, असा विश्वास लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर यांनी रविवारी येथे व्यक्त केला. सहकार वृद्धीतूनच खरा समाजवाद वाढेल, असा आशावादही त्यांनी या वेळी प्रकट केला.
`लोकमान्य’ प्रस्तुत व `सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित सहकार महापरिषदेत ते बोलत होते. ठाकूर म्हणाले, राज्यातील सहकार वाढविण्यासाठी विठ्ठलराव विखे-पाटील, तात्यासाहेब कोरे, शंकरराव मोहिते-पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ आणि वसंतदादा पाटील या दिग्गज नेत्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मेहनत आणि प्रयत्नांमुळेच राज्यात आजही सहकार चळवळ टिकून आहे. राज्यात खरा समाजवाद आणायचा असेल, तर सहकार वाढवणे हाच एकमेव मार्ग आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.
सहकाराला बदनाम करण्याचा डाव यशस्वी होता कामा नये
किरण ठाकूर यांनी यावेळी लोकमान्य सोसायटीची यशोगाथा सांगितली. `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच,’ ही घोषणा लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे केली. ज्या ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली, ते म्हणजे पूर्वीचे `ठळकवाडी’ होय. पुढे आम्ही या `ठळकवाडी’चे नामांतर `टिळकवाडी’ केले. याच टिळकवाडीत लोकमान्य मल्टिपर्पजची स्थापना 1995 ला केली. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही या नागरी सोसायटीला `लोकमान्य’ हे नाव दिले. माझे वडील बाबुराव ठाकूर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते.
लोकमान्य टिळक यांच्या हयातीत देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. पण, लोकमान्यांनी स्वातंत्र्याला जवळ आणले. त्यांनी स्वराज्य, स्वदेशी ही चळवळ सुरु केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य घडवू, असे टिळक सांगायचे. हा विचार घेऊनच आम्ही लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या दिवसापासून अत्याधुनिकीकरणाची कास धरली. ज्यावेळी राष्ट्रीयकृत बँकामध्ये संगणक नसायचे, त्यावेळी आम्ही कामाची सुरुवात संगणकावर केली, याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.
`लोकमान्य’मध्ये 75 टक्के महिला काम करत आहेत. सध्या देशातील 4 राज्यांत 213 शाखा असून, 10 लाख ग्राहक आहेत. सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता, व्यावसायिकता या चुतुःसूत्रीवर आम्ही काम करत असल्याचे सांगत बँकानी निकोप दृष्टिकोनातून आणि लोकाभिमुख काम केले पाहिजे. आम्हाला जे काही यश मिळाले आहे, त्यात अनेकांनी मार्गदर्शन केल्याचे ठाकूर यांनी आवर्जून सांगितले.