बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बेळगाव जिल्हय़ातील पूरग्रस्त परिस्थितीची मंगळवारी हवाई पाहणी केली. संबंधित मंत्री व अधिकाऱयांशी चर्चा करून पत्रकारांशी बोलताना पूरग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सांबरा विमानतळावरच आढावा बैठकीनंतर त्यांनी हवाई सर्वेक्षणाचा दौरा केला.
सकाळी 10.15 वाजता मुख्यमंत्र्यांचे बेळगाव विमानतळावर आगमन झाले. सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावून त्यांनी पुरामुळे उद्भवलेल्या वित्तहानीचा आढावा घेतला. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी योजना आखली जाईल. सर्व तपशील केंद्र सरकारला पाठवून दिला जाईल. तसेच पुढील आठवडय़ात दिल्लीला जाऊन नुकसान भरपाईसाठी अधिक निधी मंजूर करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली जाईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.
सांबरा विमानतळाच्या सभागृहात दोन्ही जिल्हय़ांच्या आमदारांच्या बैठकीत बोलताना, आमदारांनी सध्या कोरोना असल्याने आपला मतदारसंघ सोडून बाहेर जाऊ नये व सध्या महत्त्वाचीच कामे हाती घ्यावीत, असे सांगितले. जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे झालेली हानी आणि त्यासाठीचे अनुदान याची माहिती त्वरित सरकारला कळवावी, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱयांना केली. पूर परिस्थिती नियंत्रणासाठी व इतर कामासाठी बेळगाव जिल्हय़ाला 412 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. अधिक अनुदान हवे असल्यास ते सुद्धा दिले जाईल. पुराने उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या बांधणीसाठी 174 कोटी रुपयांचे अनुदान आहे. तर अन्य निधीमध्ये रस्ते दुरूस्ती व अन्य कामे हाती घेतली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे बेळगाव वगळता इतर जिल्हय़ात सुद्धा पुरेसा निधी उपलब्ध आहे. बेघर झालेल्या बेळगावमधील 44,156 लाभार्थिंना 488 कोटीची नुकसान भरपाई देण्यात येत आहे. बेळगाव आणि धारवाड येथील समस्यांची आपल्याला जाणीव असून, कोविड 19 मुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित पीकहानी व घर पडल्यामुळे झालेले नुकसान देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला. महसूलमंत्री आर. अशोक यांनीही पुरामुळे झालेले नुकसान लवकर दिले जाईल, असे सांगितले. गृहमंत्री बसवराज बोम्माई, बेळगाव जिल्हय़ाचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी, धारवाड जिल्हय़ाचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली. महांतेश कवटगीमठ यांनी रस्त्यांची चाळण झाल्याने सध्या किमान 50 ते 60 कोटी निधी त्यासाठी वितरित करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, धारवाडचे आमदार अरविंद बेल्लद, आमदार शंकर पाटील, अमृत देसाई, आमदार महांतेश कौजलगी, महांतेश दोड्डगौडर यांनी सुद्धा आपल्या भागाच्या समस्यांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जिल्हय़ातील पूर परिस्थितीचा आढावा सादर केला. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पूर नियंत्रणाबाबत महाराष्ट्र सरकारशी केलेल्या चर्चेची माहिती दिली. याप्रसंगी हातमाग मंत्री श्रीमंत पाटील, खासदार आण्णासाहेब जोल्ले, खासदार इरण्णा कडाडे, आमदार पी. राजीव, दुर्योधन ऐहोळे, उमेश कत्ती, महांतेश कौजलगी, आमदार अनिल बेनके, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, के. एल. आतिक आदी उपस्थित होते.