भंगीबोळातील अतिक्रमणाकडेही मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : भंगीबोळ रस्त्यावर टाकलेल्या माती-कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे चालत जाणेही मुश्कील
प्रतिनिधी / बेळगाव
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. मात्र ठराविक भागातच विकास करण्यात येत असल्याने काही परिसर विकासापासून वंचित आहे. तानाजी गल्ली भंगीबोळातील अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, रस्ता अरुंद झाला आहे. तसेच कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. येथील समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट शहर बनविण्यासाठी प्रशासन आटापिटा करीत आहे. कोटय़वधी निधीचा चुराडा करून रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम व इतर विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र सदर कामे ठराविक भागातच करण्यात येत आहेत. तर काही भाग दुर्लक्षित असल्याने नागरी सुविधा उपलब्ध होणे कठीण बनले आहे. परिणामी या भागातील नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
जुन्या धारवाड रोड परिसरात उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र या भागातील समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका, रेल्वे खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याने कानाडोळा केला आहे. परिणामी येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुन्या धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर सर्व्हिस रस्ता निर्माण करण्याकडे कानाडोळा केला आहे. त्याचप्रमाणे येथून वाहणाऱया नाल्याची भिंत खराब झाली असून, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तसेच नाल्याच्या चेंबरवरील झाकण गायब झाल्याने येथील रस्त्यावरील चेंबर उघडे आहेत. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी आणि वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. विशेषतः तानाजी गल्ली आणि महाद्वार रोड परिसरातील उड्डाणपुलाशेजारील उघडे चेंबर अपघाताला निमंत्रणच देत आहेत.
भंगीबोळात मातीचे ढिगारे
तसेच महाद्वार रोड मुख्य गल्ली आणि तानाजी गल्लीच्यामध्ये भंगीबोळ सोडण्यात आले आहे. सदर बोळातील रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, काही नागरिकांनी घरे भंगीबोळाच्या रस्त्यावरच बांधली आहेत. तसेच भंगीबोळात मातीचे ढिगारे आणि कचरा टाकण्यात आल्याने असलेला रस्तादेखील बंद झाला आहे. कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरत असून, रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश घरांची विभागणी झाल्याने काही रहिवासी ये-जा करण्यासाठी भंगीबोळाचा वापर करीत असतात. पण रस्त्यावरील माती व कचऱयाच्या ढिगाऱयांमुळे चालत जाणेदेखील मुश्कील बनले आहे.
नागरिकांना वाहने पार्क करण्यासही अडथळा निर्माण होत आहे. येथील अतिक्रमणाची पाहणी करण्यात यावी. तसेच भंगीबोळातील कचऱयाची उचल करून रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.