रेल्वे खात्यानंतर ड्रेनेज-गटार बांधकामामुळे आता मनपाने ठेवले गेटबंद : नागरिकांचे मात्र हाल
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज ते लोंढा यादरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात असल्याने मागील शनिवारपासून तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. रेल्वेगेटचे काम पूर्ण झाले तरीही अद्याप रेल्वेगेट उघडण्यात आलेले नाही. रेल्वेनंतर आता महानगरपालिकेने डेनेजचे काम हाती घेतल्याने रेल्वेगेट बंद आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे मात्र हाल होत
आहेत.
नैर्त्रुत्य रेल्वेने शनिवार दि. 19 पासून रेल्वेगेट बंद ठेवले होते. दोन रेल्वे ट्रक घालून बाजूला गेटमनसाठी नवीन केबीनचे काम बुधवारपर्यंत करण्यात आले. त्यामुळे या काळात तानाजी गल्ली रेल्वेगेट बंदच होते. त्यातच महानगरपालिकेने ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, फुलबाग गल्ली, तानाजी गल्ली या परिसरात डेनेज व गटारीचे काम हाती घेतल्यामुळे पुन्हा रेल्वेगेट बंद ठेवले आहे. रेल्वे विभागानंतर आता महानगरपालिकेने रेल्वेगेट बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
डेनेजचे काम सुरू
डेनेजचे काम सुरू असताना वाहनांचा अडथळा होऊ नये, यासाठी गेटबंद ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. पावसाळय़ाच्या दिवसात रेल्वेट्रकशेजारी सांडपाणी साचत असल्याने याची दुरुस्ती केली जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना उलट प्रवास करून छत्रपती शिवाजी उड्डाणपूल अथवा कपिलेश्वर उड्डाणपुलावरून वाहतूक करावी लागत आहे.