गटार बांधण्यासाठी रेल्वे फाटकाशेजारी खोदाई : वाहनधारकांची गैरसोय, पूर्वसूचना न देताच काम सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रेल्वे फाटकांवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र तानाजी गल्ली व कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळील सांडपाणी निचरा होण्यातील अडथळा दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. तानाजी गल्ली रेल्वे फाटकाजवळ गटार बांधण्यासाठी आता पुन्हा वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे फाटकावर वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. तसेच रेल्वेमार्गाची संख्या वाढविण्यात आली असून रेल्वेगाडय़ांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असल्याने रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे.
पण कपिलेश्वर उड्डाणपूल आणि तानाजी गल्ली रेल्वे फाटकाजवळ असलेल्या डेनेज वाहिन्यांद्वारे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने सांडपाणी साचून रहाते. पावसाळय़ात पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. येथील समस्येचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. पण याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे.
महापालिकेच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने काम रखडले
वास्तविक पाहता रेल्वे फाटकाचे काम करतेवेळी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी रेल्वेमार्गाखालून मोठय़ा आकाराच्या पाईप घालणे शक्मय होते. पण महापालिकेच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने हे काम रखडले आहे. आता गटार बांधण्यासाठी तानाजी गल्ली रेल्वे फाटकाचा रस्ता पुन्हा बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक बंद ठेवल्याने वाहनधारकांची गैरसोय होत असून रस्ता बंद ठेवण्यात आल्याची पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने आलेल्या वाहनधारकांना परत जावे लागत आहे. परिणामी महापालिकेच्या अंदाधुंद कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. गटार बांधण्यासाठी हा रस्ता आठ दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनधारकांना जुना धारवाड रोड आणि कपिलेश्वर उड्डाणपुलावरून ये-जा करावी लागणार आहे.