प्रतिनिधी/ बेळगाव :
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे फाटकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, तानाजी गल्ली येथील रेल्वे फाटकावरील समस्या जैसे थे आहे. या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत असून तासन्तास थांबणाऱया काही वाहनांमुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडत आहे. यामुळे या रेल्वे फाटकावरील समस्या कधी मार्गी लागणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
एसपीएम रोडचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे काही वाहनधारक जुना धारवाड रोड आणि महाद्वार रोड परिसरात उपलब्ध असलेल्या रस्त्यांचा वापर करीत आहेत. कॉलेज रोड, जुना धारवाड रोड आणि खानापूर रोडचे काँक्रिटीकरण, बसवेश्वर उड्डाणपुलाची दुरुस्ती अशी विविध विकासकामे सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यामुळे काही वाहने फुलबाग गल्लीतील मार्गांवरून धावू लागली आहेत. परिणामी वाहतुकीचा ताण तानाजी गल्लीत वाढल्याने चार चाकी, प्रवासी रिक्षा आणि दुचाकी अशी सर्व प्रकारची वाहने या मार्गाने ये-जा करीत आहेत. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत आहे. तानाजी गल्ली रस्त्यावर काही चार चाकी वाहने कायमस्वरुपी थांबविण्यात आली आहेत. रस्त्यावर दुरुस्तीकरिता वाहने थांबविण्यात येत असल्याने तानाजी गल्ली येथे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. सर्वच वाहने अडकून राहत असल्यामुळे कोंडीमधून वाहनांना मागे-पुढे करता येत नाही.
तानाजी गल्ली येथील फाटकावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने रहदारी पोलिसाची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. पण ही समस्या भेडसावत असूनही रहदारी पोलीस खात्याने याबाबत कोणतीच दखल घेतली नाही. रहदारी पोलीस नसल्याने फाटकाच्या दोन्ही बाजूने येणारे दुचाकी वाहनधारक संपूर्ण रस्त्यावर थांबत असल्याने जाण्यासाठी मार्ग शिल्लक राहत नाही. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याची दखल रहदारी खात्याचे पोलीस घेतील का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत.