वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत काँग्रेसच्या नव्या समितीच्या स्थापनेनंतर त्वरित पक्षात मोठा वाद उभा ठाकला आहे. शिवगंगा येथील काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी या समितीमुळे कुठलाच लाभ होणार नसल्याचे ट्विट करत म्हटले आहे. 100 हून अधिक जणांच्या समितीचा अर्थ कुणाचीच जबाबदारी निश्चित नाही तसेच कुणाकडे काहीही करण्याचा अधिकार नसणार, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एप्रिल तसेच मेदरम्यान तामिळनाडूत विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात काँग्रेसची द्रमुकसोबत आघाडी आहे. परंतु दोन्ही पक्षांदरम्यान आतापर्यंत जागावाटप झालेले नाही. तर कार्ती यांनी स्वतःच्या ट्विटमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांनाही टॅग केले आहे. .
काँग्रेसने शनिवारी तामिळनाडूसाठी नवी समिती जाहीर केली असून यात 32 उपाध्यक्ष, 57 महासचिव आणि 104 सचिव आहेत. याचबरोबर 56 जणांची एक कार्यकारी समिती आहे. पुढील काही दिवसांमध्ये अन्य राज्यांसाठीही समितीची घोषणा काँग्रेस करणार आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यापूर्वीच्या या हालचाली असल्याचे मानले जात आहे.