मतदानपूर्व अनुमान – टाईम्स नाऊ – सी-वोटरचे संयुक्त सर्वेक्षण
नवी दिल्ली /वृत्तसंस्था
पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी टाईम्स नाऊ आणि सी-वोटरकडून एकत्रितपणे मतदानपूर्व जनमत सर्वेक्षण करण्यात आले. ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये भाजपच्या अपेक्षांना झटका बसणार असल्याचे संकेत दिसत आहेत. दुसरीकडे पाँडिचेरीमध्ये मात्र रालोआचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्त्वाखालील एलडीएफ सत्तास्थान टिकवून ठेवणार असल्याचे दिसत आहे. आसाममध्ये पुन्हा भाजपप्रणित रालोआचीच सत्ता येणार असून 126 पैकी 67 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केरळमधील 140 जागांपैकी डाव्या नेतृत्वाखालील एलडीएफला 82 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी काँग्रेसप्रणित युडीएफला 56 जागा मिळू शकतात. ओपिनियन पोलमध्ये सीएम पी. विजयन अजूनही लोकांची पहिली पसंती आहेत. केरळमध्ये भाजपला धक्का बसू शकेल. पुदुच्चेरीमध्ये द्रमुकबरोबर युती करण्याचा फायदा काँग्रेसला होण्याचे संकेत मिळत आहेत.
तामिळनाडूत अम्मांच्या पक्षाला धक्का
तामिळनाडूमध्ये अम्मांचा पक्ष एआयडीएमकेसह भाजपलाही धक्का बसणार असल्याचे दिसत आहे. राज्यातील 244 जागांपैकी संपुआला (द्रमुक-काँग्रेस आघाडी) 158 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर अणाद्रमुक-भाजप युतीच्या खात्यात 65 जागा मिळतील असा अंदाज आहे. येथे एमएनएमला 5, एएमएमकेला 3 आणि इतरांना तीन जागा मिळण्याचा अंदाज टाईम्स नाऊ आणि सी-वोटरने वर्तवला आहे. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री म्हणून स्टॅलिन यांनाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
आसाम-पुदुच्चेरीमध्ये पुन्हा भाजप आघाडी
आसाममधील ओपिनियन पोलनुसार भाजपप्रणित रालोआच पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. येथे भाजप युतीला 126 पैकी 67 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर, संपुआला मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळून 57 जागांपर्यंत मजल पोचेल अशी अपेक्षा आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 विधानसभा जागांपैकी भाजपप्रणित रालोआला 16 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर संपुआच्या खात्यात 13 जागा जातील असेही म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये जोरदार चुरस
संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक निकाल अपेक्षित आहेत. येथे भाजप दमदार मुसंडी मारणार असले तरी सत्तास्थान काबीज करण्यात अपयशी ठरणार असल्याचे दिसत आहे. राज्यात ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली तृणमूलचे सरकारच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज आहे. 294 पैकी 154 जागा तृणमूलला मिळण्याचा अंदाज असून भाजपला 100 हून अधिक जागा मिळण्याचे भाकितही वर्तविण्यात आल्याने राज्यात सत्तेसाठी संघर्षमय स्थिती निर्माण होऊ शकते.