विधानसभा निवडणुकांत ‘तृणमूल काँग्रेस’ची ‘क्लीन स्वीप’, मात्र ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का, भाजपच्या मनसुब्यांवर पाणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांपैकी पश्चिम बंगालमध्ये नेमके काय घडते याकडे सर्वांत जास्त लक्ष लागून राहिले होते. मात्र भाजपला पूर्ण जोर लावूनही सदर राज्य जिंकणे शक्मय झालेले नसून तृणमूल काँग्रेसने आपला बालेकिल्ला राखताना मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांची कमाई करून दाखविलेली आहे. मात्र ममता बॅनर्जींना स्वतःला पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्षाची स्थिती ‘गड आला, पण वाघीण गेली’ अशी झाली आहे. आसाममध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले असून पुदुचेरीमध्ये एनआर काँग्रेस, अण्णाद्रमुक व भाजप यांचा समावेश असलेली ‘रालोआ’ सत्तेवर आलेली आहे. तामिळनाडूत अण्णाद्रमुकला नमवून द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने, तर केरळमध्ये डाव्या आघाडीने प्रस्थापितविरोधी कौलाला न जुमानता बाजी मारली आहे.
पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपने सारी शक्ती पणाला लावली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि इतर कित्येक केंद्रीय नेत्यांनी तेथील रिंगणात उतरून प्रचाराचा सपाटा लावला होता. त्यामुळे यावेळी भाजप तेथे किमया करून दाखवणार अशी हवा निर्माण झाली होती.? तसेच ‘एक्झिट पोल’मधून ‘तृणमूल’ काठावरील बहुममताने सत्तेवर येईल व भाजप आणि त्यांच्यात काँटे की टक्कर होईल असेच चित्र समोर आले होते. पण प्रत्यक्षात तृणमूल काँग्रेसने हॅटट्रिकची नोंद करताना निर्विवाद यश मिळविले आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 211 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी त्याहून तीन जागा अधिक जिंकत 214 ज्ग्नाागांची कमाई तृणमूलने करून दाखविली आहे.
भाजपला 77 जागांवर समाधान मानावे लागले आहे. असे असले, तरी मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. त्याचा विचार करता भाजपने मोठे यश मिळविले आहे मात्र पक्षाने यावेळी दोनशे जागा जिंकण्याचा दावा केला होता तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 121 विधानसभा मतदारसंघांत त्यांनी आघाडी मिळवली होती. मात्र,भाजपचा घोर अपेक्षाभंग झालेला आहे. या निवडणुकीत पश्चिम बंगालमधून डाव्या पक्षांचा आणि काँगेसचा पूर्णपणे सफाया झालेला असून मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी 76 जागा जिंकून दुसरे स्थान मिळविले होते. यावेळी या दोन्ही पक्षांना उघडता आलेले नाही. डाव्यांची प्रमुख विरोधी पक्षाची जागा आता भाजपने घेतली आहे.
नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पराभूत
मतमोजणीला सुरुवात झाली असता भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत दिसत होती. मात्र नंतर तृणमूलने त्यांना खूप मागे टाकत दोनशेच्या पार झेप घेतली व ही आघाडी कायम राहिली. परंतु अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्रामची आपली जागा वाचविता न आल्याने पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे. नंदिग्राममधील निकालावरून उलटसुलट वार्ता आल्यानंतर शेवटी ममता यांना त्यांचे एकेकाळचे सहकारी व अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सुवेंदू अधिकारी यांच्याकडून फक्त 1967 मतांनी पराभूत व्हावे लागले आहे. असे असले, तरी ममता बॅनर्जी तिसऱयांदा बंगालच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होतील हे निश्चित झाले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, लॉकेट चॅटर्जी या भाजपाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर भाजपचे मुकुल रॉय, तृणमूलतर्फे उतरलेले माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी, मदन मित्रा, अरुण बिस्वास यांनी विजयाची नोंद केलेली आहे.
तामिळनाडूत दहा वर्षांनी द्रमुक सत्तेवर
तामिळनाडूत दहा वर्षांनी सत्तेत आलेल्या द्रमुक पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीने मोठय़ा विजयाची नोंद करताना 234 पैकी 148 जागा जिंकलेल्या आहेत. 2011 पासून सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला 84 जागांवर समाधान मानावे लागले आहे. एम. करुणानिधी आणि जयललिता या तामिळनाडूतील दोन दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत झालेली ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत उतरलेल्या ‘एएमएमके’च्या नेतृत्वाखाली आघाडीला आणि कमल हासन यांच्या पक्षाची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, अण्णाद्रमुकचे नेते व तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानिस्वामी यांनी विजयाची नोंद केली आहे.
आसामात भाजपची पुन्हा मुसंडी
आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 126 पैकी 75 जागा जिंकून आपला विजय पक्का केला आहे. राज्यातील पुन्हा सत्तेवर येणारे पहिले बिगरकाँग्रेसी सरकार बनण्याचा मान मिळवून भाजपने इतिहास निर्माण केला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक प्रंट तसेच बोडोलँड पिपल्स प्रंट आणि साम्यवादी व अन्य पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीची दौड 49 जागांवर रोखली गेली आहे.
केरळात डाव्या आघाडीची सरशी
केरळमध्ये मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने 95 जागा जिंकून पुन्हा सत्ता मिळविली आहे आणि ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आलेला अंदाज खरा ठरविला अहे. 2016 मधील निवडणुकीच्या तुलनेत त्यांनी 4 जागा अधिक कमावल्या आहेत. केरळमध्ये मागील चार दशकांत सत्तेवर राहिलेल्या कुठल्याही पक्षाला पुन्हा निवडून येता आलेले नाही. हा इतिहास डाव्या आघाडीने बदलून टाकलेला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला पुढील पाच वर्षे पुन्हा एकदा विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागणार असून त्यांना 43 जागा प्राप्त झालेल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत त्यांनी एका जागेची अधिक भर घातलेली आहे. गेल्या वेळी एक जागा जिंकून पदार्पण करणाऱय भाजपाला यावेळी किमान सहा जागा जिकण्याची विश्वास वाटत होता, मात्र यावेळी त्यांना खातेही खोलता आलेले नाही.
पाँडिचेरीत सत्तापालट
काँग्रेसच्या व्ही. नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या पुदुचेरीमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालातून एनआर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’कडे सत्ता जाईल हे स्पष्ट झाले आहे. सदर आघाडीने 14 जागा जिंकलेल्या असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आणि द्रमुकचा समावेश असलेल्या आघाडीला केवळ 7 जागा जिंकलेल्या आहेत
पोटनिवडणुकांचे परिणाम संमिश्र
चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाबरोबरच काही राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकाही झाल्या होत्या. त्यात राजस्थानातील 3 जागांपैकी काँगेसने 2 तर भाजपने एका जागेची कमाई केली. झारखंडमध्ये सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाने 1 जागा निसटत्या मताधिक्क्याने जिंकली. मध्यप्रदेशात दामोह येथे काँगेसचा विजय झाला, तर गुजरातमधील एक जागा भाजपने प्रचंड मताधिक्क्याने जिंकली. लोकसभेच्या चार जागांसाठीही पोटनिवणूक झाली. त्यात वायएसआर काँगेस 1, भाजप 1, काँग्रेसने 1 तर मुस्लीम लीगने 1 अशा जागा जिंकल्या आहेत.