दर 10 मिनिटाला वाहतूक कोंडी : नागरिकांचा जीव कासावीस : अधिकाऱयांचे समस्येकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी / सातारा
पोवईनाक्यावरील सातारा तहसील व प्रांत कार्यालयात तसा विस्तीर्ण आवार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तेथे पार्किंगचा प्रचंड बटय़ाबोळ झालेला आहे. एकीकडे कोरोना संसर्ग स्थितीत सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे असताना या कार्यालयात सध्या होत असलेल्या गर्दी व वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
सध्या कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अल्पसंख्येने बाधित वाढ सुरुच आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह सातत्याने अद्याप कोरोना संसर्ग थांबलेला नाही. मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन करत आहेत. मात्र, सातारा तहसील कार्यालय परिसरातील चित्र खूपच धक्कादायक असून वाहतूक कोंडीने तेथे येणाऱया सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या विविध प्रकारचे दाखल काढण्यासाठी तहसील व प्रांत कार्यालयात नागरिकांची गर्दी आहे. तर ग्रामपंचायत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने प्रचंड वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पार्किंगचा पूर्ण बटय़ाबोळ झाला असून प्रवेशद्वारापासून सुरु झालेल्या पार्किंगने आतील सर्व परिसर व्यापून टाकला आहे. त्यातच प्रत्येक विभागात गर्दी, परिसरात गर्दी आणि प्रवेशद्वारावर दर 10 मिनिटाला वाहतूक कोंडी होत असल्याने सर्वांचा घाम निघत आहे.
सेतू कार्यालयात देखील कोणतेही नियम पाळले जात नाही. तिथे असलेल्या रांगांमध्ये सुरक्षित अंतर राखले जात नाही तर परिसरात असंख्यजण विनामास्क वावरताना दिसत आहेत. यावर काहीतरी मार्ग काढावा, असे तहसीलदारांनाही वाटत नाही. प्रांताधिकारी तर या समस्येपासून अनभिज्ञच असावेत, असे दिसते आहे. कारण दररोज ही समस्या जाणवत असताना तिथे उपाय योजना करण्याचे त्यांच्या मनात देखील येत नाही.
कोंडीत सापडलेय तहसील कार्यालय
ग्रेड सेपरेटरमुळे तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होतेय. दोन्ही बाजूस सेपरेटर करण्यात आल्याने रस्त्यावर पार्किंग उरलेले नाही. सर्व पार्किंग तहसील कार्यालयाच्या आतच होवू लागले आहे. येणारा प्रत्येक नागरिक हा दुचाकी, चारचाकी घेवूनच तहसील कार्यालयात येत असतो. कोंडी होत असते. त्रास सर्वांनाच होतोय पण त्यावर उपाय काढण्याचे कोणालाच काही सुचत नसल्याचे चित्र सध्या येथे दिसून येत आहे.