प्रतिमा सुधारण्यासाठी तालिबानी नेत्यांची धडपड
काबूल / वृत्तसंस्था
गेल्या पंधरा दिवसात अफगाणिस्तान पूर्णपणे अशांत बनले आहे. बहुतांश भागावर ताबा मिळविल्यानंतर तालिबान्यांचा हैदोस सुरूच आहे. शेजारील देशांसोबत तालिबानी कसे संबंध ठेवणार यासंदर्भात अंदाज व्यक्त केले जात असतानाच तालिबानी नेत्याने भारतासोबत सलोखापूर्ण संबंध ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांच्या वादात अफगाणिस्तानला खेचू नये असही त्यांनी म्हटले आहे.
तालिबान प्रत्येक देशासोबत आपले राजकीय संबंध चांगले ठेवू इच्छित आहे. असे असतानाच तालिबानकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधासंदर्भात एक विधानसमोर आले आहे. कतारमधील दोहा येथे तालिबानच्या राजकीय धोरणांचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजई यांनी यासंबंधी भाष्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी यापूर्वी सुरू असलेल्या सर्व चर्चा आणि अफवांना फेटाळून लावले. पाकिस्तानला सोबत घेत तालिबान भारताविरुद्ध एकजूट दाखवणार असल्याची चर्चा त्यांनी फेटाळली. आम्ही असे काही करणार नसून शेजारील सर्व देशांसोबत आमचे संबंध चांगले राहावे हीच इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी भारत-पाकिस्तान संदर्भात विधान केले होते. आपापसातील मुद्दे भारत-पाकिस्तानने चर्चेतून सोडवले पाहिजेत. दोघेही शेजारी देश असल्याने काश्मीरचा प्रश्न चर्चेतून सोडवला जावा, असे मुजाहीदनी म्हटले होते.
विमानतळाचा ताबा घेण्यास तालिबान सज्ज- मुजाहीद
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहीद यांनी काबूल विमानतळावर ताबा घेण्यासंदर्भात अमेरिकेच्या संकेतांची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. विमानतळाचे नियंत्रण करणाऱया तज्ञ आणि इंजिनीअर्सची टीम आपल्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे लष्कर काबूल विमानतळावरून बाहेर निघताच आपले तज्ञ विमानतळावर ताबा घेतील, असेही त्यांनी सांगितले. ठरलेल्या वेळेमध्ये म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य परत बोलावणार असल्याचे अमेरिकेने यापूर्वी स्पष्ट केले आहे.
लवकरच नव्या सरकारची घोषणा
तालिबानने अफगाणिस्तानच्या 34 पैकी 33 प्रांतांच्या गव्हर्नर आणि पोलीस प्रमुखांची नावे निश्चित केली आहेत. लवकरच देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीही काम सुरू केले जाईल, असे जबीहुल्लाह यांनी म्हटले आहे. आगामी काही दिवसांत तालिबानमध्ये नव्या सरकारची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. सरकार स्थापन करण्यात काही अडचणी आहेत, पण त्यावर चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.