नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील कोरोनाच्या दुसऱया लाटेची स्थिती गेल्या दोन दिवसांपासून सुधारत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या नवीन बाधितांमध्ये घट होत असतानाच मृतांचा आकडा मात्र वाढला आहे. गेल्या 24 तासात, देशात एका दिवसात विक्रमी 4,187 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जी आतापर्यंत एकाच दिवसात मृत्यूची सर्वाधिक संख्या आहे. मृत्यूसंख्या वाढली असली तरी नव्या बाधितांचा आकडा उतरणीकडे लागून पुन्हा 4 लाखांच्या जवळपास आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी देशात 4 लाख 1 हजार 78 इतकी नवीन प्रकरणे समोर आली आहेत. नव्या बाधितांमुळे कोरोनाची लागण झालेल्या एकूण बाधितांची संख्या 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 इतकी झाली. शुक्रवारी दिवसभरात 3 लाख 18 हजार 609 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 1 कोटी 79 लाख 30 हजार 960 जण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर, 2 लाख 38 हजार 270 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 37 लाख 23 हजार 446 इतके सक्रिय रुग्ण आहेत.