पुणे / प्रतिनिधी :
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ उद्या (बुधवारी) दुपारच्या सुमारास हरिहरेश्वर ते गुजरातच्या दमण या दरम्यान धडकणार आहे. त्यामुळे मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवाामान विभागाने दिला आहे. जेव्हा हे वादळ किनार्यावर धडकेल, तेव्हा याचा वेग ताशी 120 किमी इतका जास्त राहणार असून, पाऊस तसेच वार्यामुळे नुकसानीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी ‘निसर्ग’ या चक्रीवादळात रुपांतर झाले. ताशी 6 किमी वेगाने ते प्रवास करीत असून, बुधवारी दुपारी ते अलिबागजवळ हरिहरेश्वर व गुजरातमधील दमण या किनारपट्टीच्या दरम्यान धडकणार आहे. याच्या प्रभावामुळे पुढील 24 तासांत मुंबई, ठाणे पालघर, रायगड येथे अतिवृष्टीचा इशारा आहे.