बीसीसीआयचे स्पष्टीकरण, नेतृत्व बदलाच्या चर्चेत तथ्य नसल्याचा खुलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील संघाचे नेतृत्व सोडेल, या चर्चेत काहीही तथ्य नसून तिन्ही क्रिकेट प्रकारात विराटकडेच नेतृत्वाची धुरा असेल, असे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी म्हटले आहे. टी-20 विश्वचषकानंतर नेतृत्वात विभागणी होईल व मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जाईल, अशी चर्चा दोन-एक दिवसांपासून सुरु होती. त्याला पूर्णविराम देण्यासाठी बीसीसीआयने हे स्पष्टीकरण दिले.
‘नेतृत्वात बदल होणार, या चर्चेत काहीही तथ्य नाही. हे सर्व काही बालिशपणाचे आहे. नियामक मंडळात याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही आणि तिन्ही क्रिकेट प्रकारात विराटच कर्णधार असेल’, असे अरुण धुमल यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
विराट कोहलीने 45 टी-20 व 95 वनडे सामन्यात नेतृत्वाची धुरा सांभाळली असून टी-20 मध्ये 27 तर वनडेमध्ये 65 विजय संपादन करुन दिले आहेत. यंदाचा टी-20 विश्वचषक दि. 17 ऑक्टोबर पासून खेळवला जाणार असून दि. 14 नोव्हेंबर रोजी जेतेपदाचा फैसला होईल. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात व ओमानच्या भूमीत होईल. भारतीय संघाच्या मोहिमेची सुरुवात दि. 24 ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने होईल. सुपर-12 गटातील ही पहिलीच लढत असणार आहे.
भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड व अफगाणिस्तान या संघांचा समावेश असून साखळी फेरीअखेर यातील पहिले दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेतील पहिली उपांत्य लढत दि. 10 नोव्हेंबर रोजी अबु धाबी येथे तर दि. 11 रोजी दुसरा उपांत्य सामना दुबईत खेळवला जाणार आहे. त्यानंतर या स्पर्धेतील फायनल दि. 14 नोव्हेंबर रोजी होईल. दि. 15 नोव्हेंबर हा राखीव दिवस असणार आहे.
भारतीय संघाने या स्पर्धेसाठी अलीकडेच आपला संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची संघाचा मेंटर म्हणून नियुक्ती केली आहे. या स्पर्धेकरिता भारताने यजुवेंद्र चहलऐवजी अनुभवी रविचंद्रन अश्विनला पसंती दिली आहे.