माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर यांचे मत
प्रतिनिधी / वास्को
रेल्वे दुपदरीकरण, महागामार्गाचे रूंदीकरण आणि वीज वहनाचा प्रकल्प हे विकासासाठी असून राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेच या प्रकल्पांकडे पहायला हवे. या प्रकल्पांना होणारा विरोध हा विकासविरोधी लोकांच्या लॉबीचा विरोध असल्याचा आपल्याला संशय आहे. विरोध करण्याची कोणतीच आवश्यकता नाही, असे मत माजीमंत्री व भाजपानेते राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केले आहे.
गोव्यात होऊ घातलेल्या तिन्ही केंद्रीय विकास प्रकल्पांविरूध्द सध्या काही लोकांकडून आंदोलन सुरू आहे. विशेषत: दक्षिण गोव्यात या आंदोलनामुळे वातावरण तापलेले आहे. या पाश्वभूमीवर भाजपा नेते राजेंद्र आर्लेकर यांनी अशा आंदोलनाची गरजच नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रकल्पांना विशिष्ट लॉबीचाच विरोध
या प्रकल्पांचा का, कोणास आणि कसला त्रास होणार आहे. या प्रकल्पांबाबत आंदोलन करणाऱया लोकांना खरेच काही माहिती आहे काय, असा आपल्याला संशय वाटत असल्याचे आर्लेकर म्हणाले. विरोधकांकडून उगाच कसलेही दावे करण्यात येत आहेत. या प्रकल्पांना होणारा विरोध हा योग्य नाही. गोव्यातील विकास प्रकल्पांना विरोध करणारी एक विशिष्ठ लॉबी या आंदोलनामागे असावी असा आपल्याला संशय वाटत आहे. खरे तर सर्व लोकांनी या प्रकल्पांमागे उभे राहायला हवे. रेल्वेचे दुपदरीकरण हा काही नवीन विकास प्रकल्प नाही. हे फार जुने नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवा. जिथे रस्ता तिथेच विकास असतो. विकासाच्या दृष्टीनेच या प्रकल्पांकडे पाहायला हवे असे आर्लेकर म्हणाले.
आतापर्यंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रश्नावर उघड मते व्यक्त केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेली उत्तरे विरोधकांनी समजून घ्यायला हवीत. उगाच विरोध करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.