विजय मिळण्याची भाजपला अपेक्षा
केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये यंदा विजयाची संधी असल्याचे भाजपचे मानणे आहे. येथील त्रावणकोर राजघराण्याचा कल भाजपच्या दिशेनेच राहिला आहे. याचबरोबर मागील काही वर्षांमध्ये भाजपने येथे स्वतःचे बळ वाढविले आहे. 2016 च्या निवडणुकीत ओ. राजगोपाल यांनी भाजपला विधानसभेत स्थान मिळवून दिले होते. त्यांना तिरुअनंतपुरमच्या निमोम मतदारसंघातून विजय मिळाला होता.
यंदाच्या निवडणुकीत जिल्हय़ातील 14 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपचे किमान 4 उमेदवार तुल्यबळ लढत देत आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन (निमोम), राज्य सरचिटणीस शोभा सुरेंद्रन (कजाककुट्टम), अभिनेता कृष्ण कुमार (तिरुअनंतपुरम शहर) आणि वरिष्ठ नेते व्ही.व्ही. राजेश (वट्टीयोर्कवू) हे भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर जिल्हय़ात भाजपचे आणखीन दोन उमेदवार पी.के. कृष्णदास (कट्टकडा) आणि राज्य सचिव सी. शिवंकुट्टी (अरुविककर) हे विरोधकांना तीव्र आव्हान देत आहेत.
तिरुअनंतपुरममध्ये भाजपला कधीच 16 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळालेली नाहीत. पण 2014 च्या लोकसभा आणि 2016 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार दुसऱया स्थानावर राहिले होते. तिरुअनंतपुरममधील ‘नायर’ समुदायावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. हिंदू मतदारांमध्ये 30 टक्के हिस्सेदारी नायर समुदायाची आहे. भाजपने येथे शबरीमला मंदिराचा मुद्दा प्रचारात लावून धरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरुअनंतपुरममध्ये प्रचारसभा घेत डावे तसेच काँग्रेस यांच्यावर कडाडून टीका केली होती. सोने तस्करी प्रकरणी राज्यातील सत्तारुढ डाव्या आघाडीला लक्ष्य करत मोदींनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर शरसंधान केले होते.