वार्ताहर / दोडामार्ग:
तिलारी नदीपात्रात साचलेला गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, हा गाळ काढण्यास यांत्रिकी विभाग वेळकाढूपणा करत आहे. परिणामी पावसाळय़ात नदीला पूर आल्यास हे पाणी लगत असणाऱया गावात शिरून धोका निर्माण होतो. यंदादेखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील, असे शिवसेना जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस यांनी सांगितले. तसेच या आशयाचे एक निवेदन जिल्हाधिकाऱयांना देणार असल्याचेही गवस यांनी सांगितले. यावेळी गवस पुढे म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीला गेल्या दोन वर्षापासून पावसात मोठय़ा प्रमाणात पाणी येते व आजुबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरून मोठय़ा प्रमाणात हानी होते. मुळातच या नदीवर तिलारी धरणाचे पाणी सोडले जाते. तसेच पावसाचे पाणी, नदी, नाले यांचे पाणी तसेच चंदगड येथील धामणे धरणाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे पावसामध्ये पाणी मोठय़ा प्रमाणात आल्याने गावात तसेच वस्ती व घरांमध्ये पाणी शिरते. असे असतानाही प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेते. तिलारी नदीचा गाळ काढण्याकरिता यांत्रिक विभाग अलोरा, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, तिलारी पाटबंधारे प्रकल्प यांची जबाबदारी होती. तसेच पाखरण अंतर्गत काही ठिकाणी वरील विभागामार्फत गाळ काढला होता. मात्र, ज्या ठिकाणी गाळ काढायचा होता, त्या भागाचा गाळ काढला नाही व आवश्यक नसलेल्या ठिकाणी गाळ काढण्यात आला. गेल्या दोन वर्षांमध्ये कोनाळकट्टा, वायंगणतड, आवाडे, साटेली-भेडशी आदी गावांच्या वस्ती व घरामध्ये पाणी येते. या गावातील नदीचा गाळ काढला नाही. नको त्या भागामध्ये मशीन लावून गाळ काढण्याचा वेळकाढूपणा यांत्रिकी विभागाने केला आहे. या भागातील लोकांना प्रशासनाने या गाळ काढण्याच्या कामात चालढकल केल्यामुळे हा त्रास होणार आहे. या बाबतचे निवेदनही जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन लवकरच सादर करणार असल्याचेही गवस यांनी सांगितले.