भगवान श्रीकृष्णाने बाणासुराला अभयदान दिले. त्याचे प्राण वाचले. पण त्यापूर्वी त्याचे सहस्त्र बाहू तोडले व सैन्याचा संहार केला तो कशासाठी? याचे कारण भगवान महादेवाला श्रीकृष्णाने सांगितले, ते असे –
जरी तूं म्हणसी तरी कां पहिलें । याचें सैन्य संहारिलें ।
बाणबाहूंचें खंडन केलें । तेंही वहिलें अवधारिं ।
सहस्र शाखांचा पादप । दैत्यें मानूनि धरिला दर्प ।
तया दर्पाचें स्वरूप । अल्प स्वल्प तुज कथितों ।
पूर्वीं अनन्यभावें शरण । होवोनि भजतां तुझे चरण ।
तैं त्वां होवोनि सुप्रसन्न । मागें वरदान म्हणीतलें ।
येणं शोणितपुररक्षणा । तुज याचिलें गौरीरमणा ।
पुढती प्रसन्न करूनि जाणा । समराङ्गणा प्रार्थिलें ।
सहस्रबाहुबळप्रताप । तेणें दैत्या चढला दर्प ।
म्हणे त्रिजग समरिं मसीं अल्प । तुज साटोप धरिं म्हणे ।
सहस्र भुजांचें कंडूशमन । करावया समर्थ नाहीं आन । तुज शिवातें म्हणे बाण । समराङ्गण करिं मजसीं । ऐकोनि याच्या सदर्प बोला । त्वांही क्षोभोनि वर दीधला ।
उषा वरील जैं दाद्ला । तैं मिळेल तुजला प्रतियोद्धा ।
तया दर्पाचें उपशमन । सत्य करावया तव वरदान ।
बाणबाहूंचें कृंतन । चपेंकरून म्यां केलें ।
आणि भूमीसी भाररूप । बाणचमूचा प्रचंड दर्प ।
तो म्यां सज्जूनि शार्ङ्गचाप । ससाक्षेप संहरिला ।
भगवान श्रीकृष्ण म्हणतात – बाणासुराचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी याचे हात तोडले आहेत. तसेच जी सेना पृथ्वीला भार झाली होती, तिचा मी संहार केला.
आतां ऐकोनि तव प्रार्थना । म्यां जीवदान दिधलें बाणा ।
चारी बाहु रक्षिले जाणा । अजर तव गणामाजी असो । अवशिष्ट रक्षिले चारी कर । ते या होतील अजरामर । तव पार्पदांमाजी वर । निर्भय असुर मम वरें।
तुझ्या पार्षदांमाजी मुख्य । वरि÷ होवोनि भोगील सुख ।
माझा अनुग्रह हा निष्टंक । ऐकोनि त्र्यम्बक तोषला । याचे चार हात अजून शिल्लक आहेत. ते अजर व अमर होतील. आपल्या पार्षदांमध्ये हा प्रमुख असेल. आता याला कोणापासूनही कोणत्याही प्रकारची भीती नाही. हे ऐकून महादेवांना संतोष वाटला.
श्रीकृष्णाचा होतां वर । चपें रक्षिले चारी कर ।
शिवें आणूनि बाणासुर । ठेववी शिर हरिचरणीं।
कृष्णे हस्त ठेवूनियां माथां । झाला स्वमुखें अभय देता ।
बाणें सांडूनि जीवभयव्यथा । भजला तत्त्वता तें ऐक । अभय लाहूनि ऐसिये परी । श्रीकृष्णातें वंदूनि शिरिं । प्रवेशोनिया शोणितपुरिं । सोडी झदकरी अनिरुद्धा । देऊनि अभ्यंग सोद्वर्तन । उषा नोवरी कन्यारत्न ।
वसनाभरणीं गौरवून । रथारोहण करवी त्यां ।
बोहरें वाहोनि दिव्य रथी । सवेग आणिलीं कृष्णाप्रति । बळकृष्णांतें करी विनंती । कीजे वसती दीन एक ।
रामकृष्ण म्हणती तया । तुजवरी पूर्ण शिवाची दया ।
यालागीं ओपिलें पूर्ण अभया । स्नेह हृदयामाजी धरिं ।
Ad. देवदत्त परुळेकर