प्रतिनिधी / बेळगाव
शाहीन क्लब ऑफ इंडिया, बेळगावतर्फे मंगळवारी धारवाड येथील लेखिका मेहर अफरोज यांच्या ‘तुटती सरहदे’ या उर्दू कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. हॉटेल नियाजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय सहारा या उर्दू दैनिकाचे वार्ताहर समद खानापुरी, पत्रकार फारूख हन्नान, शाहीन क्लब ऑफ इंडियाचे चेअरमन मुस्ताक फारूकी, इस्लामिया हायस्कूलचे प्राचार्य डॉ. यासीन राही, कर्नाटक उर्दू अकादमीचे माजी चेअरमन कदीर नाझीम यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
धारवाड येथील लेखिका मेहर अफरोज यांनी महिलांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी लिहिली आहे. महिलांचे प्रश्न, यातना, त्यांच्यावर होणारे अत्याचार, पारतंत्र्य, तसेच दोन देशांमधील ताणलेले संबंध यावर त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून भाष्य केले आहे. यापूर्वी त्यांनी एनसीईआरटी व कर्नाटक राज्याच्या पाठय़पुस्तक मंडळासाठी इंग्रजी, हिंदी व कन्नड भाषांमध्ये अनेक पुस्तके लिहिली आहेत. प्रकाशनाप्रसंगी कदीर नाझीम म्हणाले, आज प्रत्येकाने लिहिण्यास सुरुवात करावी. काहीवेळा चुकाही होतील. परंतु लिहिल्याने पुढील पिढीपर्यंत आपण आपल्या विचारांमधून जिवंत असतो. उर्दू बोलणाऱयांची संख्या वाढली असली तरी शिक्षण घेण्याऱयांची संख्या कमी होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. लेखिका मेहर अफरोज यांनी कादंबरी कशी तयार झाली, याविषयीची माहिती दिली. यावेळी सी. के. एस. नाझीर,
ऍड. मुल्ला, दस्तगीर अलवाडकर, अमानऊल्ला निझामी, पैगामी इंत्तेहाजचे संपादक इक्बाल अहमद जकाती यांच्यासह उर्दू भाषिक मुस्लीम, साहित्यप्रेमी उपस्थित होते.