प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जय्यत तयारी सुरू झाली असून विविध पक्ष तसेच इतर राजकीय नेत्यांकडून प्रत्येक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. सध्या कुडचडे-काकोडा पालिकेने परवानगी न घेता लावलेले फलक काढून टाकण्याचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत नुकत्याच गोव्यात प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसने गुरुवारी रात्री लावलेले फलक शुक्रवारी सकाळी पालिका कर्मचाऱयांनी काढून टाकले.
यासंबंधी पालिका मुख्याधिकारी नीलेश धायगोडकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, पालिकेकडून फक्त निवडक फलक काढण्यात आलेले नसून परवानगी न घेता लावलेला प्रत्येक फलक काढण्यात येणार आहे. या मुद्यावर काही स्थानिकांना विचारले असता त्यांनी स्वतःचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोलताना सांगितले की, हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती धर्मातील सण येतात तेव्हा किती तरी फलक पूर्ण कुडचडेत लावलेले दिसून येतात. पण त्यावेळेस कुडचडे पालिकेने कधीच कुणावरही कारवाई केलेली दिसून आलेली नाही. मात्र जेव्हा तृणमूल काँग्रेस पक्षाने कुडचडे मतदारसंघात पदार्पण केल्याचे जनतेला कळविण्यासाठी फलक लावले तेव्हाच पालिकेला परवानगी घेण्याची गरज का लक्षात आली, असा सवाल लोक करताना दिसू लागले आहेत.
एरव्ही लोकांना त्रास होत असलेले दुकानांचे बेकायदेशीर फलक तसेच विक्रीसाठी पदपथावर ठेवलेली सामग्री पालिका कधीच हटवत नाही. पण लोकांना कोणताच त्रास होत नसलेले आणि तेही एखाद्या दिव्याच्या खांबावर वा इतर ठिकाणी लावलेले फलक काढण्यात पालिका जास्त लक्ष का घालत आहे, असाही सवाल लोक करू लागले आहेत. यात पालिकेच्या आडून अन्य कोणाचे कारस्थान असण्याची शंका लोक व्यक्त करू लागले आहेत. तशी कुडचडे बाजारात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.