वार्ताहर/ संगमेश्वर
तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी पाझर तालावाला भगदाड पडल्याने फणसवणे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे. 1980 साली या पाझर तलावाचे बांधकाम करण्यात येऊन यावर जवळपास 10 गावांच्या प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात आल्या होत्या. प्रादेशिक नळपाणी योजनेबरोबर उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र ते कागदावरच राहिले आहे.
आज या पाझर तलावाची अवस्था ही तिवरे धरणासारखी झाली आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात. पाण्याचा विसर्ग होतो, त्या फरशीला आतून पिचिंग करण्यात आले. पाझर तलावात पाणीसाठा जास्त झाल्यास तो सोडण्यासाठीचे दरवाजे नादुरुस्त झाले आहेत. त्याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष दिलेले नाही. मे 2021 मधे लाखो रुपये खर्च करुन या धरणाच्या फरशीला भगदाड कसे पडले, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
जिह्यातील महापूर, ढगफुटीसदृश पाऊस या पार्श्भूमीवर पाटबंधारे विभागाने जिह्यातील सर्व धरणांची पाहणी करणे गरजेचे असताना महसूल, अथवा पाटबंधारे विभागाचा कोणीही अधिकारी तिकडे फिरकलेला नाही. बुधवारी सकाळी या धरणाच्या फरशीला भगदाड पडल्याचे दिसले. ही बाब ग्रामस्थानी कळंबस्तेचे ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील यांच्या कानी घातली. त्यांनी गावचे सरपंच, तलाठी आणि ग्रामस्थांसमवेत पाहणी केली असता धरणाच्या पाण्याचा विसर्ग होतो. तेथे बाहेरील बाजूस मोठे भगदाड पडल्याचे दिसले. पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिला असता तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत होती. याला जबादार कोण, असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. हा पाझर तलाव फुटला तर कळबस्ते, फणसवणे, कसबा आदी गांवाना धोका पोहोचू शकतो. प्रशासनाने याची वेळीच दखल घ्यावी अन्यथा गंभीर परिस्थिती ओढवेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.