जोगत्याच्या वेशात भिक्षा मागणाऱयाला भररस्त्यात मारहाण
प्रतिनिधी / बेळगाव
तो बेंगळूरचा… मिरजेला गेला होता… खिशात पैसा नाही… भूक आवरेना… त्यावेळी पोटासाठी रेल्वेस्थानकावर टाळय़ा वाजवून मदतीसाठी हात पसरणाऱया तृतीयपंथियांशी त्याची ओळख झाली. पँटवर साडी गुंडाळून तोही टाळय़ा वाजवू लागला. बघता बघता महम्मदचा तायाप्पा बनला. मात्र, हे त्याला चांगलेच महागात पडले.
मिरजेहून बेळगावला आलेला 55 वषीय महम्मद येथेही तृतीयपंथियांच्या वेशात भिक्षा मागू लागला. दिवसभर बाजारपेठेत फिरून भिक्षा मागायची आणि रात्री बसस्थानकावर झोपायचे. हा त्याचा नित्यक्रम बनला. गुरुवारी समादेवी गल्ली परिसरात त्याची गाठ खऱया तृतीयपंथियांशी पडली व पुरुष असूनही जोगत्याच्या वेशात भिक्षा मागणाऱया महम्मदची त्या तृतीयपंथियांनी भर रस्त्यात धुलाई केली. समादेवी गल्ली येथे गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा राडा झाला. जोगत्याच्या वेशात भिक्षा मागणाऱया तोतया तायाप्पाची भररस्त्यात तीन तृतीयपंथी धुलाई करीत होते. त्यामुळे तब्बल पंधरा ते वीस मिनिटे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. तोतया तायाप्पाला वाचविण्यासाठी पोलिसांना पाचारण केले.
खडेबाजार पोलिसांनी सागरपाळय़ा, हेगडेनगर, बेंगळूर येथील महम्मद नामक 55 वषीय गृहस्थाला ताब्यात घेतले आहे. महम्मद नशेत होता. दुकानांना भेटी देत टाळय़ा वाजवत तो पैसे मागत होता. त्याचवेळी बेळगाव येथील एका तृतीयपंथियाला तो भेटला. दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर बेळगाव येथील आणखी दोघे तृतीयपंथी तेथे पोहोचले. त्यांनी त्याची चौकशी केली असता आपण बेळगावचाच आहे. आपणही तुमच्यापैकीच एक आहे, असे सांगत त्यांच्यासमोरही तो टाळय़ा वाजवत होता.
लहानपणीच आम्ही शारीरिक कमतरतेमुळे घर सोडले. तृतीयपंथियाचे जीवन स्वीकारले. लोक आमची पूजा करतात. शक्तीनुसार दक्षिणा देतात. आम्ही त्यांचे भले होऊ दे, असा आशीर्वाद देतो, हे असे चाललेले असताना तोतया तायाप्पामुळे आमच्या पंथाची बदनामी होते. महम्मद पूर्णपणे नशेत आहे. आम्ही महिलांकडे पैसे मागत नाही. महम्मद महिलांना अडवून पैसे मागत होता. म्हणून आम्ही त्याला पकडून पोलिसांकडे सोपविले आहे, असे स्थानिक तृतीयपंथियांनी सांगितले.
मराठीतील ‘जोगवा’ या चित्रपटामुळे जोगत्यांच्या आयुष्याचे विदारक दृश्य सामोरे आले होते. या चित्रपटातील तायाप्पाची भूमिका आजही प्रत्येकाच्या डोळय़ासमोर आहे. पूर्वी तृतीयपंथियांकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिले जात होते. आता सरकार व नागरी समाज दोघांनीही त्यांना काही प्रमाणात स्वीकारले आहे. आमच्या वाटय़ालाही चांगले जगणे येऊ शकते, या विश्वासात ते जीवन कंठत असतानाच त्यांच्या विश्वातही तोतयांचा प्रवेश झालेला आहे. याची त्यांना चीड आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत खडेबाजार पोलीस स्थानकात या प्रकरणाची चौकशी सुरू होती.