ऑनलाईन टीम / मुंबई :
अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौक्ते’ चक्रीवादळ केरळ, तामिळनाडू आणि गोवा किनारपट्टी ओलांडून रविवारी रात्री ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दाखल झाले आहे. या वादळाने रौद्र रुप धारण केले असून, ते आता गुजरातच्या दिशेने सरकू लागले आहे. त्यामुळे दीव किनारपट्टीसह गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. या वादळाचा वेग ताशी 20 किमी तर वाऱ्याचा वेग प्रचंड आहे.
तौक्ते चक्रीवादळ सध्या मुंबईपासून नैऋतेकडे 170 किमी तर दीवपासून 840 किमी अंतरावर आहे. या चक्रीवादळाने अतितीव्र रुप धारण केले असून ते मंगळवारी पहाटेपर्यंत पोरबंदर आणि महुआदरम्यान किनाऱ्याला धडकडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चक्रीवादळ गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग वाढणार असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी 170 ते 180 इतका राहणार आहे. हवामान विभागाने मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.