राज्यातदोघांचेबळी,अनेकजणजखमी : घरांची,झाडांचीमोठय़ाप्रमाणातपडझड,पडझडीमुळेवीजखात्याचीमोठीनुकसानी
प्रतिनिधी / पणजी
‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह जबरदस्त तडाखा गोव्याला बसला आहे. यामध्ये कोटय़वधांची हानी झाली आहे. अनेक घरांवर, वाहनांवर, तसेच रस्त्यावंर झाडे कोसळल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक मार्ग बंद झाले आहेत. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे अनेक घरांचे, दुकानांचे पत्रे उडाले तसेच वीज खांब कोसळल्याने शहरातील व ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला. तसेच अनेक भागात काळोखाचे साम्राज्य निर्माण झाले. अनेक गावांन रात्री व दिवसा वीज गायब झाल्याने तेथील लोकांचे हाल झाले. तशीच स्थिती शहरातील अनेक परिसरात दिसून आली.
कोरोनाचे संकट सुरू असतानाच वादळाचे दुसरे संकट आल्यामुळे लोक भयभीत झाले आहेत. काल रविवारी लोक घरातून बाहेरच पडले नाहीत. मुसळधार पावसामुळे शहरी, ग्रामीण भागातील लोकांना घरातून बाहेर पडणे अशक्य बनल्याने रविवारी रस्ते अगदीच वाहनरहित होते. त्यातच संचारबंदी लागू असल्याने रविवारी एकंदरीत जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले.
संकट टळल्याचे वाटतानाच मोठा तडाखा
वादळ आणि पावसाने रौद्ररुप धारण केल्याने रस्त्यांशेजारील अनेक मोठ-मोठे जाहिरात फलक उन्मळून कोसळले. वीज नसल्याने अनेक गावात रविवारी सकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. रविवारी संपूर्ण दिवस वीज व पाण्याविना काढण्याची वेळ आली. मुसळधार पाऊस, घोंगावणारा सुसाट वारा यामुळे लोकांनी घराची दारे खिडक्या बंद करून घरात राहिले. या वादळाचा गोव्यावरील धोका टळला, असे एकंदरीत वाटत असतानाच या वादळाने राज्याला मोठा तडाखा दिला आहे.
राज्यभरात पावसाने घातला धुमाकूळ
चक्रीवादळासह मुसळधार पावसाने गेल्या चोवीस तासांत संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला. म्हापसा येथे सर्वाधिक म्हणजे 150 मी.मी. (सहा इंच) पावसाची तर राजधानी पणजीत 125 मी.मी. (पाच इंच) पावसाची नोंद झाली. मुरगाव येथे 60 मी. मी. जुने गोवे येथे 140 मी. मी., पेडणे येथे 75 मी. मी. एवढा पाऊस पडला. संपूर्ण गोवाभर हा पाऊस सातत्याने सुरूच आहे.
राजधानीसह राज्यातील अनेक रस्ते पाण्याखाली
पेडण्यापासून काणकोणपर्यंत संपूर्ण राज्यात शहरांसह ग्रामीण भागात वरील परिस्थिती दिसून आली. अग्निशामक दलाला मोठय़ा संख्येने फोन आले त्यानंतर दलाच्या जवानांनी रस्त्यावर, घरांवर कोसळलेली झाडे हटविण्याचे काम सुरू केले आहे. जोरदार पावसासह वादळी वारे सुरूच राहिल्यामुळे त्यांच्या कामात सातत्याने व्यत्यय येत होता. तरीदेखील त्यांनी आपले काम चालूच ठेवले होते. शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आणि सखल भागात पाणी तुंबल्याने वाहतुकीत समस्या निर्माण झाली. काही ग्रामस्थांनी आपापल्या गावतील रस्त्यांवर कोसळलेली झाडे स्वतः हटवून रस्ते मोकळे केले. सातत्याने पाऊस पडल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले असून अनेकांच्या घरांसह दुकानांत पाणी शिरले.. राजधानी पणजीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून तलावाचे स्वरुप आले आहे.
केबल, टेलिफोन वायर्स, वीजवाहिन्या तुटल्या
राजधानी पणजीत व इतरत्र अनेक दुकानांचे जाहिरात फलक तसेच अनेक घरांचे केबल, डिटीएच, टाटास्काय अशी वेगवेगळी क्नेक्शने तुटल्यामुळे खंडित झाली आहेत. परिणामी कोरोना रुग्णांना घरी विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांच्यासह इतरांचे मनोरंजनाचे साधन नष्ट झाले आहे. अनेक टेलिफोन वायर्स, वीजवाहिन्या तुटून लोंबकळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून त्याचे परिणाम संपूर्ण गोव्यात झाल्याचे समोर आले आहे. वादळाचा फटका सर्वांनाच बसला असून अनेक वाहनांना अपघातही झाले असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यांवर कचऱयाचे साम्राज्य
जोरदार वादळी पावसाने शहरातील व ग्रामीण रस्ते कचरामय व चिखलमय झाल्याचे चित्र दिसून आले. झाडांच्या फांद्या, पाने तसेच इतर कचरा रस्त्यावर सर्वत्र पडलेला आढळला. दगड-माती बारीक काठय़ांमुळे आधीच दिसणारे अस्वच्छ रस्ते पूर्णपणे खराब झाले होते. त्यामुळे दुचाकी चालकांना धोका निर्माण झाला. एकाच दिवशी मोठय़ा प्रमाणात जिकडे-तिकडे झाडांची पडझड झाल्यामुळे अग्निशामक दलावर मेठा ताण वाढला. ते एकाच वेळी सर्व ठिकाणी रस्ते मोकळे करण्यासाठी किंवा झाडे हटविण्यासाठी पोहोचू शकले नाहीत. रात्री उशिरापर्यंत ती झाडे हटविणे शक्य झाले नाही.
वीज खात्याचे राज्यभरात मोठे नुकसान
पाणजीतील अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्याने ते रस्ते बंद करावे लागले. वाहने ‘नो एंट्री’ मधून दुसऱया रस्त्याने वळवावी लागली. 33 केव्हीचे अनेक वीजफिडर व वीज वाहिनींचे मोठे नुकसान झाले असून वीज खात्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जोरदार वादळी पावसामुळे वीज खात्याच्या कर्मचाऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला वादळी पाऊस सलग चोवीस तास म्हणजे रविवारी रात्रीपर्यंत चालू होता. या चक्रीवादळाची झळ शहरांसह ग्रामीण भागातील लोकांना बसली आहे.
मळा भागातील अनेक घरांत, दुकानात पाणी
राजधानी पणजीत मळा भागातील अनेक घरांत, दुकानात पावसाचे पाणी घुसले आणि त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले आहे. मळावासियांना पावसाचे पाणी घरात येण्याचा त्रास अद्याप चालू असून तो संपलेला नाही. हेच त्यातून उघड झाले आहे. पणजीचे आमदार तसेच पणजी मनपातर्फे मळा भागात पाणी साचणार नाही अशी आश्वासने वारंवार देण्यात येतात परंतु ती फसवी असल्याचे पहिल्याच पावसाने दाखवून दिले आहे. या प्रकरणी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी मळा भागातील लोकांनी केली आहे.
केळी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
चक्रीवादळात केळी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून जिकडे – तिकडे गावांमध्ये केळीची झाडे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे केळी पीक घेणाऱया शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. पेडण्यापासून पणजीपर्यंत या प्रतिनिधीने फेरफटका मारला तेव्हा अनेक गावातून केळीची झाडे भुईसपाट झाल्याचे दिसून आले. शिवाय आंब्याची अनेक झाडे जिकडे – तिकडे उन्मळून पडली आहेत. तसेच माडही कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गाची हानी झाल्याचे समोर आले आहे.
राज्यात प्रचंड नुकसानी : मुख्यमंत्री
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या रौद्रावताराने राज्याला प्रचंड दणका दिला असून विविध ठिकाणी उन्मळून पडलेल्या शेकडो वृक्षांमुळे घरे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. विजेचे खांब कोसळल्याने वीज खात्याला मोठय़ा वित्तीय हानीला तोंड द्यावे लागले आहे. त्याशिवाय माड आणि वीज खांब अंगावर पडल्याने जीवित हानी होण्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या चक्रीवादळात नुकसानी झालेल्या प्रत्येकाला सरकारतर्फे शक्य तेवढय़ा लवकर भरपाईरुपी मदत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.रविवारी सायंकाळी उशिरा आल्तिनो निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खबरदारी घेतल्याने रुग्णसेवेला झळ नाही
सुदैवाने शनिवारीच गोमेकॉत क्रायोजनिक टाकी कार्यान्वित करण्यात आल्यामुळे ऑक्सिजन पुरवठय़ावर कोणताही परिणाम झाला नाही. अन्यथा बंद पडलेल्या रस्त्यांमुळे ऑक्सिजन वाहतुकही प्रभावित होऊन रुग्णांच्या जीवनमरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असता. त्याशिवाय सर्व इस्पितळांसाठी आधीच ’पॉवर बॅकअप’ ची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे खंडित झालेल्या वीज पुरवठय़ाची झळ इस्पितळांना बसली नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दोघांचा मृत्यू
माझलवाडा हणजूण येथे माड अंगावर पडल्याने शीतल पाटील (34) ही युवती जागीच ठार झाली. दुसऱया घटनेत माशेल भागात चालत्या दुचाकीवर विजेचा खांब पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. त्याशिवाय वास्को येथे वृक्ष घरावर पडल्यामुळे तिघे जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत.
वीज खात्याला लाखोंची नुकसानी
चक्रीवादळाच्या या तडाख्यात सुमारे 500 झाडे उन्मळली. त्यामुळे सुमारे 200 घरांसह असंख्य वाहनांचे नुकसान झाले. काही झाडे वीज तारांवर पडली. त्यातून वीज खांबही खाली कोसळले. काही ठिकाणी वीज ट्रान्स्फॉर्मरही कोसळले असून वीज खात्याला लाखोंची नुकसानी सहन करावी लागली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या चक्रीवादळासंबंधी विविध खात्यांकडून मिळालेल्या सूचनांनुसार मच्छिमार, पॅप्टन ऑफ पोर्ट, वीज, पोलीस, अग्निशामक, पीडब्ल्यूडी, आदी खाती तसेच आपत्कालीन व्यवस्थापन टीम यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले होते. खास करून किनारी भागातील गाव, मच्छीमारी समुदाय यांच्यावर जास्त लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले होते. एनडीआरएफची टीमही गोव्यात दाखल झाली होती. तौक्ते चक्रीवादळ गोव्यातून पुढे सरकले असले तरी त्याने आपला प्रभाव जबरदस्त दाखवलाच आहे. एवढेच नव्हे तर पुढील तीन-चार दिवस त्याचा प्रभाव जाणवणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बार्देशात, मुरगावात सर्वाधिक नुकसानी
या वादळामुळे उत्तर गोव्यात बार्देश तालुक्यात तर दक्षिण गोव्यात मुरगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसानी झाली आहे. बार्देशमध्ये 31 पेक्षा घरांचे नुकसान झाले. त्यात 17 घरांची मोठी नुकसानी झाली. तर मुरगावमध्ये 36 पेक्षा जास्त झाडे कोसळली. एनडीआरएफच्या टीमने वास्कोत बचावकार्य केले. त्याशिवाय वाळपई, तिसवाडी, पेडणे, या तालुक्यातही मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळली आहेत. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले. राज्यभरात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला असून खात्याचे अभियंते व कर्मचारी अखंड कार्यरत झाले आहेत. त्याशिवाय बंद पडलेले रस्ते खुले करण्यासाठी सर्व पालिका आणि महापालिकांचे कर्मचारी तसेच अग्नीशामक दलाचे कर्मचारीही मेहनत घेत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बांबोळीत उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी इस्पितळासह कोविड उपचार केंद्र असलेल्या शामाप्रसाद स्टेडियमलाही चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले असता सुपर स्पेशालिटीतील वॉर्डच्या काही खिडक्या रुग्णांच्या सोबत असलेल्यांनी खुल्या केल्यामुळे पाणी आत आल्याचे सांगितले. तसेच प्रचंड वाऱयामुळे स्टेडियमचे काही पत्रे उडून गेले असून लवकरच ते दुरुस्त करण्यात येईल असे सागितले.
परिस्थिती नियंत्रणात मनपाची महत्वपूर्ण कामगिरी
राजधानीसह पणजी मतदारसंघात अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे बराच काळ रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले होते. त्याशिवाय अनेक निवासी प्रकल्पांच्या परिसरातही वृक्ष कोसळले होते. हे सर्व वृक्ष त्वरित हटवून रस्ते मोकळे करण्यात पणजी महापालिकेने महत्वपूर्ण कामगिरी बजावली. आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, मनपा अभियंता विवेक पार्सेकर आणि अग्नीशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी स्वतःच्या देखरेखीखाली ही सर्व झाडे हटवून रस्ते मोकळे करण्यात योगदान दिले. त्यावेळी त्या त्या प्रभागाचे नगरसेवकही उपस्थित होते. या कामासाठी 5 जेसीबी आणि अन्य यंत्रणा वापरण्यात आली. अग्नीशामक दलाच्या जवानांनीही याकामी अथक परिश्रम घेतले.