..तर खूप मोठा विध्वंस झाला असता! : तेव्हा ताशी 140 किमी वेगाने वाहत होता वारा : लोक किनाऱयावर आले होते धावून!
बुजुर्ग मच्छीमारांनी जागवल्या आठवणी
महेंद्र पराडकर / मालवण:
‘तौक्ते’सारखे महाभयानक चक्रीवादळ या अगोदर कधी पाहिले नाही, असा भयग्रस्त स्वर आज प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतो आहे. पण मालवणातील काही बुजुर्ग मच्छीमारांचे म्हणणे थोडे वेगळे आहे. 1961 सालातील तुफान तौक्तेपेक्षा प्रचंड मोठे होते. ताशी 140 किमी वेगाने वारे त्यावेळी आम्ही अनुभवले होते. जवळपास तीन दिवस ते तुफान चालले. त्या तुलनेत कालचे दीड दिवसाचे ‘तौक्ते’ वादळ छोटे होते. परंतु तौक्ते वादळात समुद्री लाटा आणि उधाणाचा जोर 61 च्या वादळापेक्षा जास्त होता, असे बुजुर्ग मच्छीमार सांगतात.
16 मे 2021 रोजी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने किनारपट्टीवरील सर्वांच्या मनाचा अक्षरशः थरकाप उडवला. जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टी भागात सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार बहुतांश मच्छीमार व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती. पण अक्राळविक्राळ तौक्तेच्या तीव्रतेपुढे काहीच सुरक्षित वाटत नव्हते. सुसाट वाऱयाने सर्वांच्या काळजात धडकी भरवली होती. माडावरील झावळं आणि नारळ खाली कोसळत असताना मच्छीमार जीव धोक्मयात घालून स्वतःच्या वाहून जाणाऱया नौका हाताने पकडून होते. समुद्र वस्तीत शिरत होता. वारा झाडं कोसळून घालत होता. वादळ शमावं म्हणून सगळीकडे देवाचा धावा सुरू होता. तौक्ते चक्रीवादळाचा हा भयाण अनुभव आजच्या पिढीसाठी नवा होता. परंतु बुजुर्ग मच्छीमारांनी वादळाचे याहीपेक्षा थरारक अनुभव घेतलेले आहेत.
नारळाच्या पेंडीच्या पेंडी कोसळत होत्या!
दांडी येथील ज्येष्ठ मच्छीमार देवीदास आचरेकर सांगतात, 24 मे 1961 साली झालेले चक्रीवादळ याहीपेक्षा खूप मोठे होते. कित्येक माड त्यावेळी मोडून पडले होते. माडाच्या पेंडीच्या पेंडी कोसळून पडत होत्या. नारळ, झावळे आणि अन्य झाडांच्या फांद्यांचा खच सर्वत्र पडला होता. त्या वादळाचा वेग साधारणपणे ताशी 140 किमी होता. जवळपास तीन दिवस वादळ मालवण किनाऱयावर स्थिरावले होते. त्यावेळी किनाऱयावर लिंगड, बोंडगी आणि मारवेल आदी धूप प्रतिबंधक वनस्पतींचा मोठा आसरा होता. त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण होऊन पाणी वस्तीत मोठय़ा प्रमाणात शिरले नव्हते. तौक्ते वादळात मात्र समुद्री लाटांचा मोठा तडाखा किनारपट्टीला बसला. त्यावेळी फुटलेल्या जहाजांच्या (तारू) तटक्मयांचाही उपयोग धूप थोपविण्यासाठी केला जायचा. 61 साली वादळात रापण व इतर मासेमारी नौकांचे नुकसान झाले होते. पण शासनाकडून फारशी मदत मिळाली नाही.
…तर अजून विध्वंस झाला असता!
दांडी येथील प्रभाकर धुरी म्हणाले, 1961 सालचे वादळ खूप मोठे होते. त्यावेळी लोक घाबरून किनाऱयावर मोकळय़ा जागेत धावून आले होते. ते वादळसुद्धा दिवसाचे झाले होते. मोठी तारवं (जहाज) वादळात बुडाली होती. आजही त्या खुणा मालवणात पाहायला मिळतात. त्यावेळी मासेमारीला गेलेले काही मच्छीमारही बेपत्ता झाले होते. 61 च्या वादळासारखा वारा जर परवा झाला असता, तर खूप मोठा विध्वंस झाला असता.
तेव्हा होती लिंगड, बोंडगी, मारवेल
बुजुर्ग मच्छीमारांच्या अनुभव कथनात लिंगड, बोंडगी, मारवेलचा आदी धूपप्रतिबंधक वनस्पतींचा उल्लेख आला. आजच्या आधुनिक काळातील विकासप्रक्रियेतही या वनस्पती तग धरून आहेत. पण 1961 च्या तुलनेत हे प्रमाण खूपच घटले आहे. पूर्वी किनाऱयावर मोठ्य़ा प्रमाणात दिसणाऱया मारवेल, बोंडगी आणि लिंगड या वनस्पती आता जवळपास 25 टक्केच शिल्लक असतील. त्यांची जागा मानवनिर्मित धूपप्रतिबंधक बंध्ग्नाारे आणि दगडी कुंपणांनी घेतलेली आहे. मारवेल, बोंडगी आणि लिंगडसारख्या धूपप्रतिबंधक समुद्री वनस्पतींचा झालेला ऱहासही सागरी अतिक्रमणाचा तडाखा वाढण्याचे एक प्रमुख कारण मानले जाते. आता पर्यटन विकासामुळे किनारपट्टीवर बंधारा कम रस्त्यांची मागणी वाढते आहे. आता ‘तौक्ते’मुळे समुद्रापासून संरक्षणासाठी ही मागणी अधिकच जोर धरणार आहे. विकासाच्या या प्रक्रियेत बोंडगी आणि लिंगडसारख्या वनस्पतींच्या उरल्या-सुरल्या अस्तित्वावरही भविष्यात गंडांतर येणार आहे.