रत्नागिरीतील बोटी : अभिनिर्णय अधिकाऱयांचे आदेश : एकूण 33 हजाराचा दंड
प्रतिनिधी / देवगड:
चीन कंपनीची एआयएस (ऍटोमेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टिम) यंत्रणा बेकायदेशीर वापर करणाऱया रत्नागिरी येथील इब्राहिम साखरकर व मिस्दाक मेहबूबखान फडनाईक यांच्या बोटी देवगड सागरी सुरक्षा यंत्रणा व मत्स्य विभाग यांच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आल्या होत्या. या बोटींवर कारवाईसाठी देवगड तहसीलदार तथा अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे दावा दाखल करण्यात आला होता. या दाव्याच्या निकालात दोन्ही बोटींचा तीन महिने परवाना रद्द करण्याचा आदेश देण्यात आला असून दोन्ही बोटींना एकूण 33 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच या बोटींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही अभिनिर्णय अधिकाऱयांनी दिले आहेत.
रत्नागिरी तटरक्षक दलाला 2 ऑक्टोबर रोजी देवगड तालुक्यातील कुणकेश्वरसमोरील समुद्रात तीन बोटींवर चिनी सिग्नल फ्रिक्वेंसी आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. तात्काळ याबाबत देवगड मत्स्य विभाग व सागरी पोलिसांना माहिती देऊन त्यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यादिवशी वादळसदृश स्थितीमुळे या बोटींचा शोध घेता आला नाही. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गिर्येसमोरील समुद्रात त्यापैकी एका बोटीचा शोध लागला. या बोटीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणण्यात आले. त्यानंतर उर्वरित दोन बोटींचा शोध सुरू असताना त्याचदिवशी दुपारी 12 वाजता आचरा (मालवण) समोरील समुद्रात रत्नागिरी येथीलच मिस्दाक मेहबूबखान फडनाईक यांच्या मालकीची ‘अलहज अब्दुल्ला’ ही बोट आढळली होती. या बोटीवरही साखरकर यांच्या बोटीप्रमाणेच चिनी कंपनीची ‘एआयएस’ सिस्टिम आढळून आली. ट्रॉलिंगचा परवाना असताना पर्ससीनची जाळी व साहित्य या बोटींवर आढळून आले. मात्र, या बोटीवर मासळी आढळून आली नाही. गिर्ये समुद्रात पकडण्यात आलेल्या बोटीवर सुमारे पाच हजार 720 रुपयांची मासळी आढळून आली. त्या मासळीचा लिलाव करण्यात आला. त्यानंतर मत्स्य परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी या बोटीवर कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
चिनी कंपनीची यंत्रणा जप्त करण्याचे आदेश
त्यानुसार बुधवारी अभिनिर्णय अधिकारी – देवगड यांनी दिलेल्या निकालानुसार इब्राहिम साखरकर यांच्या मालकीच्या बोटीला 28 हजार 600 रुपये, तर मिस्दाक फडनाईक यांच्या बोटीला पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. या दोन्ही बोटींचा परवाना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आला आहे. या बोटींवर बसविण्यात आलेली चिनी कंपनीची एआयएस ही यंत्रणा जप्त करण्यात यावी. तसेच सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी-देवगड यांनी याबाबत सक्षम अधिकारी यांच्याकडून आदेश प्राप्त करून संबंधित बोटींवर कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
बोटींवर क्षमतेपेक्षा दुप्पट खलाशी
या बोटींवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 चे कलम 5 (2) व 4 चा भंग केल्याचे म्हटले आहे. या बोटींवर 31 खलाशांपैकी 25 जणांचा सागरी जोखमीचा विमा उतरविलेला होता. तसेच बोटीची 12 खलाशांची क्षमता असताना 31 खलाशी ठेवण्यात आले होते. तसेच जाळय़ांचा आस 15 मि. मी., तर उंच 70 मि. ठेवून पर्ससीन जाळे ओढण्यासाठी ‘हायड्रोलिक बूम’ या बोटींवर असल्याचे आढळून आले होते. या बोटींवर परवाना नसताना पर्ससीन जाळे, त्या प्रकारची उपसाधने व मासेमारी सामुग्री बनविण्यात आली होती, असेही म्हटले आहे. या बोटींवरील कारवाई तात्काळ करण्याचे आदेश अभिनिर्णय अधिकारी मारुती कांबळे यांनी दिले आहेत.