अजमेर कनेक्शन प्रकरण : जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
प्रतिनिधी/ निपाणी
कर्नाटकात कोरोना नियंत्रणासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग परवानगीशिवाय अन्य राज्यातून आलेल्या प्रवाशांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे आता अजमेरहून येत परवानगी नसताना कर्नाटक हद्दीत प्रवेश केलेल्या 38 जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दि. 3 मे रोजी परवानगी नसताना सदर 38 जणांनी कर्नाटक हद्दीत प्रवेश केला होता. याचवेळी जिल्हाधिकाऱयांनीच सदर 38 जणांवर परवानगीशिवाय प्रवेश केल्याचा ठपका ठेवला होता. तर मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपण त्यांना प्रवेश दिल्याचे सांगितले होते. या विधानातील तफावतीची चर्चा सर्वत्र झाली.
याचदरम्यान दोन दिवसापूर्वी बेळगावच्या सदाशिवनगर येथील गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सदर महिलादेखील परवानगीशिवाय मुंबईहून बेळगावला आली होती. त्यामुळे याप्रकरणी तिचा भाऊ, पती तसेच कारचालकावर बेळगावात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय विनापरवानगी कर्नाटकात प्रवेश करणाऱयांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. त्यामुळे अजमेरहून आलेल्या व सुरुवातीला निपाणीत क्वारंटाईन झालेल्या 38 जणांवर तसेच त्यांना क्वारंटाईन काळात भेटावयास गेलेल्यांवरही गुन्हे दाखल होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.