दसऱया दिवशी भारतात बहुतेक ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम परंपरागतरीतीने आणि उत्साहात साजरा केला जातो. प्रभू रामचंद्रानी रावणाला अंत घडवून विजय मिळविल्याची स्मृती अशाप्रकारे जागृत ठेवली जाते. विशेषतः उत्तर भारतात आणि त्यातही उत्तर प्रदेशात रावण दहनाचे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. तथापि, याच उत्तर प्रदेशात रावणेश्वर धाम नावाचे एक धर्मस्थळ असून तेथे दसऱया दिवशी रावणाचे दहन नव्हे तर रावणाचे पूजन केले जाते.
रावण हा रामाचा शत्रू असला तरी तो भगवान शंकराचा महान भक्त होता. बारा ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथ धाम येथील शिवलिंगाची स्थापना रावणानेच केली होती, अशी मान्यता आहे. येथे भगवान शंकरांना रावणेश्वर महादेव या नावाने ओळखले जाते. याच स्थानी दसऱया दिवशी रावणाची पूजा करण्याची पद्धत आहे. या मंदिराचे प्रमुख पुजारी राहिलेले भवप्रितानंद ओझा यांनी रावणाची स्तुती करणारी अनेक कवने रचली आहेत. रावणामुळेच शंकर भगवानांची येथे स्थापना होऊ शकली, अशी परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ते मोठय़ा संख्येने रावणाच्या पूजेच्या कार्यक्रमात सहभागी होतात. रावण हा महान पंडित होता. त्याच्या दुर्गुणांची चर्चा नेहमी केली जाते. तथापि, त्याच्यातील सत्वगुणांचा सन्मान आम्ही करतो, असे या परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.