रत्नागिरीत राष्ट्रवादीतर्फे 10 वी, 12 वी, व होतकरू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरीतील आठवडा बाजार येथे मोठय़ा दिमाखदार स्वरूपात विविध स्पर्धा आयोजित करून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र यावर्षी दहीहंडी उत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा न करता या औचित्याने राष्ट्रवादीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावर्षी संपूर्ण देशात कोरोना विषाणूचे संकट आलेले आहे. रत्नागिरी जिह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन अथक परिश्रम घेत आहे. याच कारणामुळे रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा न होता साध्या पद्धतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला.
या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने सोशल डिस्टंसिंग व मास्क यांचा वापर करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक तथा पक्षाचे नेते सुदेश मयेकर, अभिजित उर्फ मणू गुरव, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बंटी वणजू, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रत्नागिरी तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, महिला शहर अध्यक्ष नेहाली नागवेकर, शहर सरचिटणीस रणजित शिर्के, उद्योजक लिलाधर शेठ नागवेकर, प्रशांत परब, दादा भाटले, बापू तोडणकर आदी उपस्थित होते.