ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्र सोमवारी एका दिवसात 5 हजार 71 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजेच 4242 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण 56 हजार 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
काल एका दिवसात डिस्चार्ज देण्यात आलेल्या 5071 रुग्णांपैकी मुंबईतील 4242, पुणे विभागातील 568, नाशिक मधील 100, औरंगाबाद 75, कोल्हापूर 24, अकोला 22, लातूर 11, नागपूरमधील 29 रुग्णांचा समावेश आहे.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात सोमवारी 2786 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण आकडा 1 लाख 10 हजार 744 वर पोहोचला आहे. राज्यात एकूण 50 हजार 554 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कालच्या दिवसात 178 मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये 122 पुरुष व 56 महिलांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 4128 जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50.61 टक्के इतके आहे, तर मृत्यू दर 3.70 इतके आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.