ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केजरीवाल सरकारने 6 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सोमवारी ( 26 एप्रिल) सकाळी 5 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावाशक सुविधा सुरू राहणार आहेत. असे असले तरी नागरिकांकडून लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसून आले.
मंगळवारी सकाळी दरियागंज भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी मास्क देखील घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करताना दिसत नव्हते. एकीकडे केजरीवाल सरकार कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हावा यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तरी देखील नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
- सोमवारी 23,683 नवे कोरोना रुग्ण
दरम्यान, राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 23,683 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 240 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच कालच्या दिवशी 21,500 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या 8 लाख 77 हजार 146 वर पोहोचली आहे. तर सद्य स्थितीत 76,887 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, 12,361 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.