ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढत आहेत, ही बाब लक्षात घेत दिल्ली सरकारने काही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.
या अंतर्गत दिल्लीतील गर्दीची ठिकाणे अनिश्चित काळासाठी बंद करण्याची परवानगी दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे मागितली आहे तसेच दिल्लीतील कन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा टाळेबंदी करण्याच्या विचारात केजरीवाल सरकार आहे.
याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आम्ही लहान स्तरावरचा लॉकडाऊनचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हे आंशिक लॉकडाउन असेल.
- विवाह सोहळ्यात आता केवळ 50 लोकांना परवानगी
पुढे ते म्हणाले, यासह सीएम केजरीवाल यांनी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विवाह सोहळ्याला येणार्या लोकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता 200 ऐवजी फक्त 50 लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. तसेच, गर्दी वाढल्यास बाजारपेठा बंद केल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या पुरेसी आहे. परंतु आयसीयूमध्ये बेडची कमतरता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आह, असेही केजरीवाल यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून काम करत आहे परंतु सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे लोकांनी काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक मास्कशिवाय फिरत आहेत. माझे त्यांना आवाहन आहे की कृपया मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, दिल्तीत गेल्या 10 दिवसांत नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. दिवसाला 8000 पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. प्रदूषण, जास्त चाचणी, निष्काळजीपणा यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.