दिल्ली/प्रतिनिधी
काेरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही कायम आहे. रुग्णवाढीचा वेग वाढल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेली रुग्णालये आणि रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदे घेऊन याची माहिती दिली.
कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं झोप उडवली आहे. कधी नव्हे इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर केजरीवाल सरकारने लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र, रुग्णांची संख्या वाढल्यानंतर रुग्णालयावर अतिरिक्त भार पडू लागला. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाउन लागू केला होता.
दरम्यान दिल्लीत मागील एका आठवड्यांपासून लॉकडाऊन लागू आहे. तरीही या काळात दिल्लीत रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहे. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाऊन एक आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.