ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
दिल्लीत एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शाह म्हणाले, दिल्ली विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अरविंद केजरीवाल अपयशी ठरले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच जिंकेल. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप स्पष्ट बहुमतात सरकार स्थापन करणार असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रानंतर झारखंडमध्येही भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. झारखंडमध्ये विकासकामे करुनही भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे झारखंडमधील पराभवाची समिक्षा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.