ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन ईशान्य दिल्लीत रविवारपासून सुरू असलेला हिंसाचार गुरुवारी शमला असला तरी देखील परिसरात तणावाचे वातावरण आहे. या हिंसाचारातील मृतांचा आकडा 39 वर पोहचला आहे. तर 364 हून अधिक जखमी झाले आहेत. गटारे आणि ढिगाऱयांखाली अजूनही मृतदेह सापडत आहेत. त्यामुळे हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 48 गुन्हे दाखल केले असून, 136 दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेच्या दोन एसआयटी करणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱयादरम्यान हा हिंसाचार झाल्याने हा पूर्वनियोजित दंगलीचा कट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. दंगलग्रस्त भागात अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्ब लाँचर, पेट्रोल बॉम्ब, दगड-गोटे, ऍसिड पाऊच सापडल्याने सुनियोजित कटाची शक्यता अधिक गडद झाली.
हिंसाचारग्रस्त भागात सरकारने शांतता समित्या स्थापन केल्या आहेत. हिंचारातील जखमींचा खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च दिल्ली सरकार ‘फरिश्ते दिल्ली के’ या योजनेमधून करणार आहे. हिंसाचार व जाळपोळीत संपत्तीचे नुकसान झालेल्यांना त्यांची कागदपत्रे पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारतर्फे शिबिर घेण्यात येत आहे. ज्यांची वाहने अथवा दुकाने जळाली आहेत, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य सरकार विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहे.