वाहतुकीची कोंडी : गोव्याचे ग्राहकही मोठय़ा संख्येने बाजारात दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीला सुरूवात झाली आहे. यामुळे खरेदीसाठी बेळगाव परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचे मंगळवारी दिसून आले. खरेदीसाठी ग्राहक दाखल झाल्याने वाहतुकीचीही मोठी कोंडी झाली. वाहने बाहेर काढेपर्यंत वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. बेळगावसह कोकण व गोव्यातून ग्राहक बेळगावमध्ये दाखल झाले होते.
शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱया मारूती गल्ली, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, खडेबाजार, काकतीवेस रोड, कलमठ रोड, रविवारपेठ, शनिमंदिर रोड येथे मोठी गर्दी झाली होती. चारचाकी वाहनांमुळे या गर्दीत अधिकच भर पडत होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी दुपारनंतर किर्लोस्कर रोड येथे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. केवळ दुचाकी वाहनांनाच यामार्गे प्रवेश दिला जात होता. चार चाकी वाहने कॅम्प परिसरात पार्क करून पुन्हा बाजारपेठेत नागरिकांना यावे लागले.
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
मंगळवारी बेळगाव बाजारपेठेतील अधिकतर दुकाने बंद ठेवली जातात. परंतु दिवाळीचा सिझन असल्यामुळे मंगळवारी देखील दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालक मिळेल त्या ठिकाणी वाहने लावून खरेदीसाठी जात होते.
भंगीबोळांमध्ये करण्यात आलेल्या पार्किंगमुळे इतर वाहनचालकांना वाहने बाहेर काढेपर्यंत नाकीनऊ आले. रामदेवगल्ली येथे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहनचालक वाहतूक कोंडीत अडकून पडत होती.
गोव्याचे ग्राहक खरेदीसाठी बेळगावात, व्यापाऱयांमध्ये उत्साह
तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील ग्राहक बेळगावमध्ये दाखल होत आहेत. मोठय़ा प्रमाणात कपडे तसेच इतर साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गोव्याच्या ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. बेळगावमधील 30 ते 40 टक्के व्यापार हा गोवा, कोकणावर अवलंबून आहे. गोव्यातील ग्राहक खरेदीसाठी येत असल्यामुळे व्यापाऱयांनाही याचा फायदा होत असून त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.
ध. संभाजी चौकात मिळेत तिथे पार्किंग
दिवाळीला सुरूवात झाल्याने खरेदीसाठी तुफान गर्दी होत आहे. चार चाकी वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने थेट धर्मवीर संभाजी चौकात मिळेल त्या ठिकाणी पार्किंग करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरातील पार्किंग तळ फुल्ल झाल्याने कॅम्प परिसरात वाहनांचे पार्किंग करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना या पार्किंगचा फटका बसला. धर्मवीर संभाजी चौकातील बसस्थानकासमोरही चारचाकी वाहने लावण्यात आल्याने प्रवाशांना याचा फटका बसला. रस्त्यावरच बस थांबवून प्रवासी बसमध्ये चढत होते. त्यामुळे पोलिसांनी अशा पार्किंगला चाप घालावा अशी मागणी नागरिकांमधून होत होती.