बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाने जादा बसेसची सोय केली आहे. मुंबई, पुणे व बेंगळूर आदी शहरांकडे 35 जादा बसेस धावत आहेत. यामध्ये वातानुकूलित बसेसचा देखील समावेश आहे. याशिवाय प्रवाशांची मागणी वाढल्यास आवश्यकतेनुसार बसेसची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती बेळगाव विभागाने दिली आहे.
दिवाळीच्या कालावधीत ही विशेष बससेवा पुरविण्यात येणार असून 10 टक्के हंगामी तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी बसने प्रवास करावा असे आवाहन परिवहनने केले आहे. परिवहनच्या www.ksrtc.in या वेबसाईटवरून आरक्षण करता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून सेवा देण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय संचार अधिकाऱयांनी दिली आहे.
महसूल भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न
दसरा सणानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले असून कोरोनाच्या काळात बुडालेला महसूल भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीसाठी आपल्या गावी परतणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी ही बससेवा पुरविण्यात आली आहे. अनलॉकमध्ये अनेक निर्बंध शिथिल झाले असले तरी रेल्वेगाडय़ा मर्यादित संख्येत धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनामुळे परिवहनचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. आता राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी मिळाल्याने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू आहे. दिवाळीनिमित्त बेळगाव बसस्थानकातून मुंबई, पुणे व बेंगळूर शहरांकडे जाणाऱया बसफेऱया वाढविण्यात आल्या आहेत.