प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
तरूण भारतच्या रोजच्या अंकासह पुरवणीत वाचन करण्याजोगे साहित्य भरपूर असते. परंतु आजची पिढी अक्षरसाहित्य वाचण्यात रस दाखवत नाहीत. नको त्या डिजीटल माध्यमामुळे भरकटली आहेत. जीवनात अक्षरसाहित्य गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अशाप्रकारचे साहित्य मिळणे कठीण झाले असल्याने दिवाळी अंकाला आधुनिकपणा, जीवंतपणा कसा देता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा दिवाळी अंक तरूणाईपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांनी पणजी तरूण भारत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.
यावेळी तरूण भारतच्या संचालिका सई ठाकूर बिजलानी, गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, जनसंपर्क अधिकारी मंगेश काळे, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक रवींद्र पाटील, वितरण विभागाचे व्यवस्थापक शंकर जाधव, सागर कारबोटकर, अकाऊंटस विभागातील आत्माराम नाईक, संदेश केरकर, जाहिरात विभागाचे प्रशांत बेळगावकर, पत्रकार शैलेश तिवरेकर, समीर नाईक, प्रज्ञा मणेरीकर, रिमा केसरकर, श्रमी भोंसुले, अमिता सावंत, सोशल मीडीयाचे गौरेश सत्तरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. वेंगुर्लेकर यांच्याहस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
आजच्या पिढीचे मूळ इंग्रजीचे आहे. त्यामुळे संस्कृती व संस्काराबाबतची विचारसरणी नकारात्मक आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी विस्कळीत होत गेली. अक्षरसाहित्याचा वारसा नसल्यामुळे नकारात्मक विचारसरणी येत आहे. अशीच विचारसरणी राहिली तर पुढे काय होईल ही चिंता वाटते. कधी कधी तर संस्कार संस्कृती राष्ट्रप्रेम हरवले नाही ना अशी शंका येते. सध्या युवापिढी घडण्यापेक्षा बिघडण्याची क्रिया जास्त आहे. डिजिटल माध्यमे असल्यामुळे स्क्रीनचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. आजच्या युवापिढीने स्क्रीनचा वापर करावा पण गरजेपुरता. नको असलेल्या विचारांची गर्दी काढून टाकून अक्षरसाहित्य आत्मसात करावे असे वेंगुर्लेकर यांनी सांगितले.
हल्ली बरेच शिक्षक व्यावसायिक झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. डिजिटली सर्व उपलब्ध असले तरीही हातात पुस्तक घेऊन वाचण्यात जी मजा आहे ती डिजिटल वाचण्यात नाही असे मत संचालिका सई ठाकुर यांनी व्यक्त केले.
दिवाळी अंकांची परंपरा ही 150वर्षाची आहे. पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, अशा अनेक दिग्गज साहित्यिकांची निर्मिती ही दिवाळी अंकांतूनच झाली आहे. तरूण भारत दिवाळी अंकांची परंपरा 70 ते 80 वर्षांची असून यातून वाचकांना दिवाळीत साहित्यिक फराळ देत असतो. यात वेगवेगळय़ा संकल्पनांचा समावेश असतो. सध्याच्या स्पर्धात्मक युगामुळे दिवाळी अंक स्पर्धात्मक बनला आहे. यामुळे दिवाळी अंकासोबत भेट देण्याची व्यवस्था करण्यात येते. दिवाळीत फराळ नसला तरी तरूण भारतचा दिवाळी अंक वाचकांना जिव्हाळय़ाचा वाटतो. अजूनपर्यंत तरूण भारतने ही परंपरा टिकून ठेवली आहे. दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करून एक साहित्योत्सवाची निर्मिती करतो असे मत संपादक सागर जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.
संपादक सागर जावडेकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, समई व भेट देऊन प्रा. महेश वेंगुर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभारप्रकटन मंगेश काळे यांनी केले.